अ‍ॅपशहर

...अन् कोहलीने ५ वर्षांपूर्वीचं 'ते' अपयश 'धुतलं'!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाबाद १४३ धावांची जिगरबाज खेळी करून भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पाच वर्षांपूर्वी कॅरेबियन बेटांवरच कसोटीत पदार्पण करणारा तरुण-तडफदार विराट संपूर्ण मालिकेत अपयशी ठरला होता.

Maharashtra Times 22 Jul 2016, 12:25 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अँटिगा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india vs west indies virat kohli unbeaten at 143
...अन् कोहलीने ५ वर्षांपूर्वीचं 'ते' अपयश 'धुतलं'!


वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाबाद १४३ धावांची जिगरबाज खेळी करून भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पाच वर्षांपूर्वी कॅरेबियन बेटांवरच कसोटीत पदार्पण करणारा तरुण-तडफदार विराट संपूर्ण मालिकेत अपयशी ठरला होता. हे अपयश अँटिगा कसोटीच्या पहिल्याच इनिंगमध्ये धुवून काढत, कोहलीने पाच वर्षांत आपण कुठून कुठे पोहोचलो, हेच जगाला पुन्हा दाखवून दिलं.

२० जून २०११ रोजी जमैकाच्या सबिना पार्कवर २२ वर्षांच्या विराटनं भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत त्याने आपले बुलंद इरादे स्पष्ट केले होते. पण, पुढच्याच दोन चेंडूंवर तो अडखळला होता आणि फिडेल एडवर्डच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला होता. या धक्क्यातून बहुधा तो सावरलाच नाही. संपूर्ण मालिकेत पाच इनिंग्जमध्ये त्याने अवघ्या १५.२०च्या सरासरीने धावा केल्या होत्या. पण काल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जबरदस्त फलंदाज म्हणून आणि टीम इंडियाचा कर्णधार म्हणून तो अँटिगाच्या मैदानावर उतरला आणि लौकिकाला साजेशी खेळी करत त्याने कसोटी क्रिकेटमधील १२ वं शतक झळकावलं. त्यासोबतच कसोटीतील ३ हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे. त्याच्या या गरुडभरारीला क्रिकेटप्रेमी सलाम करताहेत.

विंडीजविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटीला काल सुरुवात झाली आणि हा पहिला दिवस विराट कोहलीचा आणि पर्यायाने भारताचा ठरला. नाणफेक जिंकून कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, मुरली विजय झटपट तंबूत परतला. पण, शिखर धवननं ८४ धावांची (१४७ चेंडू) संयमी आणि विराट कोहलीने १९७ चेंडूंत नाबाद १४३ धावांची तडाखेबंद खेळी करत विंडीजची वाट लावली. दिवसअखेर भारताने ४ बाद ३०२ धावा केल्या असून विराट आणि आर. अश्विन पीचवर टिच्चून उभे आहेत.

गेल्या वर्षभरात वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये 'झिंगाट' कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने, कसोटीतही आपण तेवढेच 'डेंजर' असल्याचं शतकी खेळीतून सिद्ध केलंय. परदेशातील हे त्याचं नववं कसोटी शतक आहे. विराटचा हा फॉर्म, आणि शतकांचा सिलसिला संपूर्ण मालिकेत कायम राहावा, अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज