वृत्तसंस्था, फोर्ट लॉडरडेल
‘ही लढत अतिशय चुरशीची झाली. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेण्याचा माझा विचार होता. पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही,’ अशी कबुली भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिली. भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात एका धावेने पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी दोन धावांची गरज होती. यात ब्राव्होने टाकलेल्या चेंडूवर धोनी शॉर्ट थर्ड मॅनला मार्लन सॅम्युएल्सकडे झेल देऊन माघारी परतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २४५ धावा केल्या होत्या. यात एव्हिन लुइसने ४९ चेंडूंत ५ चौकार व ९ षटकारसह १००, तर जॉन्सन चार्ल्सने ३३ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ७९ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने २८ चेंडूंत ६२ धावांची खेळी केली. यानंतर लोकेश राहुल आणि धोनीने शतकी भागीदारी केली. लोकेश राहुलचे शतक मात्र व्यर्थ ठरले. त्याने ५१ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. यामुळे टी-२०तील सर्वांत मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले.लढत संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, ‘अनेक गोष्टी मनासारख्या झाल्या होत्या. आमच्या डावात दोन मोठ्या भागीदाऱ्या झाल्या. लोकेश राहुलसह खेळताना आम्ही ठरविले होते, की १२च्या धावगतीने धावा जमवायच्या. पूर्ण लढतीत लोकेश राहुल कमालीचा खेळला. अडीचशे धावांचा पाठलाग करणे सोपे नसते. विजय मिळवला, असता तर आनंद झाला असता.’