अ‍ॅपशहर

उपांत्य फेरीत भारताची इंग्लंडशी गाठ

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया यांना पराभूत करून भारतीय महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत भारताची शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध लढत होत आहे.

Maharashtra Times 22 Nov 2018, 12:41 am
महिला टी-२० वर्ल्डकप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indias knockout in semifinals in england
उपांत्य फेरीत भारताची इंग्लंडशी गाठ


वृत्तसंस्था, नॉर्थ साउंड (अँटिग्वा)

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया यांना पराभूत करून भारतीय महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत भारताची शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध लढत होत आहे. भारतासाठी ही लढत दोन गोष्टींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. एक तर गेल्या वर्षी वन-डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला आहे. दुसरे म्हणजे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत दाखल होण्याची भारतीय महिला संघाला संधी आहे.

भारतीय महिला संघाने गटातील चारही लढती जिंकल्या आहेत. हरमनप्रीत कौर (४ डावांत १६७ धावा), स्मृती मंधाना (४ डावांत १४४ धावा) आणि मिताली राज (२ डावांत १०७ धावा) या भारताच्या फलंदाजीच्या आधारस्तंभ. मितालीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध ती पुन्हा संघात परतली आहे. प्रशिक्षक रमेश पोवार यांची एकच वेगवान गोलंदाज खेळवण्याची योजना यशस्वी ठरली आहे. कारण, फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. फिरकी गोलंदाज पूनम यादव (८ विकेट), राधा यादव (७), डी. हेमलता (५), दीप्ती शर्मा (४) यांनी छाप पाडली आहे. त्यामुळे मध्यमगती गोलंदाज अरुंधती रेड्डी (१० षटके) आणि मानसी जोशी (३ षटके) यांच्या वाटेला गटातील चार लढतींत केवळ १३ षटके आली आहेत. भारतीय महिला संघ गटातील चारही लढती गयानातील प्रोव्हिडन्समध्येच खेळला आहे. आता इंग्लंडविरुद्धची लढत वेगळ्या मैदानावर होत आहे.

दुसरीकडे, इंग्लंड संघाने गटात दोन विजय मिळवले, तर एक लढत गमावली आणि एक लढत रद्द झाली होती. अ गटात इंग्लंड संघ दुसऱ्या स्थानावर राहिला होता. इंग्लंडने आपले अधिक लक्ष्य वेगवान गोलंदाजांवर केंद्रित केले आहे. अॅना श्रुबसोल (७ विकेट) आणि स्किव्हर (४) यांच्याकडून इंग्लंडला अधिक अपेक्षा आहेत. गेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही साखळीत इंग्लंडने भारताला नमविले आहे.

टी-२०त आमनेसामने

१३ टी-२०

३ विजय भारताचे

१० विजय इंग्लंडचे

सामन्याची वेळ : शुक्रवारी - पहाटे ५.३० पासून

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज