अ‍ॅपशहर

लाजीरवाणाऱ्या पराभवानंतर पंजाबचे आव्हान संपुष्टात आले का, दिल्लीने आरसीबीला दिला धक्का

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना विजय मिळवावा लागणार होता. पण आजच्या सामन्यात दिल्लीने दमदार कामगिरी केली आणि पंजाब किंग्सला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पंजाबच्या संघाचे आयपीएलमधील आव्हान खरंच संपुष्टात आले आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पंजाबचे आव्हान खरंच संपले आहे का,जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 16 May 2022, 11:37 pm

हायलाइट्स:

  • पंजाबच्या संघाला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला
  • या पराभवानंतर दिल्लीचे १४ गुण झाले असले तरी पंजाबचे १२ गुणच आहेत.
  • पण या पराभवानंतर पंजाबचे आव्हान संपले की नाही, जाणून घ्या...
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पंजाब किंग्स (सौजन्य-आयपीएल ट्विटर)
नवी मुंबई : पंजाबच्या संघाला १६० धावा करून गुणतालिकेत १४ गुण पटकावण्याची सुवर्णसंधी होती. पण ही संधी त्यांनी गमावली. दिल्लीच्या संघाने त्यांचा १७ धावांनी पराभव केला आणि पंजाबला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर पंजाबच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले की नाही, याची चर्चा क्रिकेट विश्वात रंगत आहे.
या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाच्या १२ लढती झाल्या होत्या. या १२ लढतींमध्ये पंजाबच्या संघाने सहा विजय मिळवले होते, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सहा विजयांसह पंजाबच्या संघाचे १२ गुण झाले होते आणि ते सातव्या स्थानावर होते. त्यामुळे हा सामना जिंकत त्यांचे १४ गुण होऊ शकले असते. पण या सामन्यात पराभव झाल्यामुळे त्यांचे १२ गुणच राहिले. दुसरीकडे या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे १२ सामने झाले होते. दिल्लीच्या संघाने १२ सामन्यांमध्ये सहा विजय मिळवले होते, तर सहा पराभव त्यांना पत्करावा लागले होते. त्यामुळे दिल्लीच्या संघाचेही १२ गुण असले तरी ते चांगल्या रनरेटमुळे पाचव्या स्थानावर होते. पण या विजयानंतर त्यांनी १४ गुण पटकावले आणि गुणतालिकेत त्यांनी आरसीबीच्या संघाला धक्का देत चौथे स्थान पटकावले आहे. पंजाबचा संघ अजूनही १४ गुणांची कमाई करून आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. कारण आतापर्यंत गुजरात २० गुणांसह अव्वल आहे तर राजस्थान आणि लखनौ यांचे १६ गुण आहेत. त्यामुळे आता पंजाबने अखेरच्या सामन्याच विजय मिळवला तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येऊ शकते, पण दुसरीकडे दिल्ली आणि आरसीबी या दोन संघांचे पराभव होणे गरजेचे असेल. या दोन संघांनी सामना जिंकला तर पंजाबचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

कसा झाला पंजाबचा पराभव, पाहा...
दिल्लीच्या संघाने पंजाबला १७ धावांंनी पराभूत केले. पंजाबच्या संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच चेंडूवर पंजाबने दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद केले होते. पण त्यानंतर मात्र मिचेल मार्शची बॅट चांगलीच तळपल्याचे पाहायला मिळाले. कारण मार्शने यावेळी संघाचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना दुसरी बाजू लावून धरली होती आणि धावफलक हलता ठेवला होता. मिचेल मार्शने यावेळी ४८ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६३ धावांची खेळी साकारली. मिचेलच्या या खेळीच्या जोरावरच दिल्लीच्या संघाला पंजाबपुढे १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाच पाठलाग करताना पंजाबच्या संघाला जॉनी बेअरस्टोने दणदणीत सुरुवात करून दिली होती. पण जॉनी २८ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर पंजाबच्या फलंदजांनी हाराकिर पत्करल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर जितेश शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. पंजाबचा कर्णधार मयांक अगरवाल तर यावेळी शून्यावर आऊट झाला. जितेश यावेळी ४४ धावांवर बाद झाला आणि पंजाबचे आव्हान संपुष्टात आले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज