आयपीएल स्पर्धेतील आजचा सामना सनरायजर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्स या संघात होणार आहे. हैदराबादनं पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत यशस्वी सुरुवात केली आहे. तर, मुंबईला चेन्नईच्या विरोधात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. तर, हैदराबाद विजयाची मालिका सुरू ठेवण्यासाठी झुंजेल. नेमकं काय होणार, हे दोन्ही संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंवर अवलंबून असणार आहे. या खेळाडूंवर एक नजर...
राशिद खान हा आजघडीला जगातील एक आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. आयसीसी विश्वचषक पात्रता स्पर्धेत राशिदनं अफगाणिस्तानविरोधात जबरदस्त गोलंदाजी केली होती. आयपीएलच्या चालू मोसमातही राजस्थान रॉयल्सच्या विरोधात त्यानं चमकदार कामगिरी केली होती. चार षटकांत केवळ २३ धावा देऊन त्यानं जोस बटलरसारखा मोहरा टिपला होता. हैदराबादला राशिदकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
डेव्हिड वॉर्नरच्या गैरहजेरीत धडाकेबाज फलंदाज शिखर धवनची जबाबदारी वाढली आहे. पहिल्या सामन्यात ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत शिखरनं ७७ धावा केल्या होत्या. त्यात १३ चौकारांचा समावेश होता. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही त्याची कामगिरी सरस झाली होती. वॉर्नरच्या अनुपस्थितीत धवनची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. आक्रमक फलंदाजीबरोबरच त्याला डावही सावरावा लागणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईनं मागील मोसमात आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. मर्यादित षटकांच्या सामन्यासांठी रोहित हा अत्यंत उपयुक्त फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतकं हा त्याचा पुरावा आहे. श्रीलंकेच्या विरोधातील टी-२० सामन्यात त्यानं ३५ चेंडूत वेगवान शतक झळकावण्याची किमया केली होती. चेन्नईच्या विरोधातील पहिल्या सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, त्याच्याकडं दुर्लक्ष करणं हैदराबादला महागात पडू शकतं.
ऑस्ट्रेलियाचा हा गोलंदाज हैदराबादचं प्रमुख अस्त्र आहे. ताशी १५० किमी वा त्याहूनही अधिक वेगानं गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. वेगाबरोबरच गोलंदाजीवर त्याचं उत्तम नियंत्रण आहे. 'बिग बॅश' मोसमात त्यानं उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळं त्याला ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात प्रवेश मिळाला होता. त्यानंतर त्यानं इंग्लंड व न्यूझीलंड विरोधात मोठं यश मिळवलं होतं.
कृणाल पंड्या हा त्याचा लहान भाऊ हार्दिकप्रमाणेच अष्टपैलू आहे. गोलंदाजी व फलंदाजीतही तो चमक दाखवू शकतो. हाणामारीच्या षटकांत वेगानं धावा जमविण्याची क्षमता त्याच्याकडं आहे. हार्दिक पंड्या सध्या जायबंदी आहे. आजच्या सामन्यात तो खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळं कृणालची जबाबदारी वाढली आहे.