बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली : संसदेत ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाला असला तरी या भागातील इच्छुक क्रिकेटपटू मात्र तूर्तास जम्मू-काश्मीरचेच प्रतिनिधित्व करतील, असे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी म्हटले आहे.
राय यांनी म्हटले आहे की, ''लडाखला केंद्रशासित प्रदेश हा दर्जा प्राप्त झाला असला तरी त्यांची क्रिकेट संघटना बीसीसीआयशी अद्याप संलग्न झालेली नाही. तूर्तास अशा स्वतंत्र संघटनेचा आम्ही विचार केलेला नाही. त्यामुळे लडाखमधून क्रिकेट खेळू इच्छिणारे खेळाडू सद्य:स्थितीत स्थानिक क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळू शकतात.''
सध्या तरी जम्मू-काश्मीर संघात लडाखमधील खेळाडू नाही. पण पुद्दुचेरीप्रमाणे त्यांना बीसीसीआयच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळण्याबाबत राय म्हणतात की, अजून त्यावर विचार झालेला नाही.
सध्या चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूही पंजाब किंवा हरयाणाकडून खेळू शकतात. तसेच लडाखच्या बाबतीत आहे, असे राय यांनी स्पष्ट केले आहे.
''कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरला असलेला विशेष दर्जा समाप्त झाला असला तरी त्याची काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही,'' असेही राय यांनी म्हटले आहे. याआधी, काश्मीर खोऱ्यात जसे क्रिकेट चालत होते, तसेच ते यापुढेही चालू राहील, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. शिवाय, गेल्यावर्षीप्रमाणेच जम्मू-काश्मीर संघ आपल्या घरच्या मैदानावरील सामने श्रीनगरमध्येच खेळतील. त्यासाठी पर्यायाचा विचार करण्यात आलेला नाही.
काही दिवसांपूर्वी श्रीनगरमधील सर्व क्रिकेट शिबिरे सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर या भागातील क्रिकेट प्रशिक्षक व १०० पेक्षा अधिक उदयोन्मुख खेळाडू काश्मीर खोऱ्याबाहेर निघून गेले आहेत.