म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र संघाला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अ गटातून आगेकूच करायची असेल, तर आजपासून (शुक्रवार) सुरू होणाऱ्या लढतीत दिल्लीवर निर्णायक विजय मिळवणे गरजेचे आहे. मात्र, बलाढ्य दिल्लीला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही. त्यामुळे या लढतीत महाराष्ट्राची कसोटी लागणार आहे.
अ गटात महाराष्ट्र संघ चौथ्या स्थानावर आहे. चार लढतींपैकी महाराष्ट्राला केवळ उत्तर प्रदेशवर विजय मिळवता आला आहे. कर्नाटकाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना महाराष्ट्राला एक डाव अन् १३६ धावांनी हार पत्करावा लागली. यानंतर रेल्वेविरुद्धची लढत अनिर्णित राखून आघाडीचे तीन गुण मिळवण्यात महाराष्ट्राला यश आले. तत्पूर्वी, हैदराबादविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आता उर्वरित तिन्ही लढती तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
या महत्त्वाच्या लढतीतही महाराष्ट्राचा भरवशाचा फलंदाज केदार जाधव खेळणार नाही. दुखापतीतून तो पूर्णपणे सावरलेला नाही. त्याची अनुपस्थिती महाराष्ट्राला नक्कीच जाणवेल. मागील रेल्वेविरुद्धच्या लढतीत अंकित बावणे आणि रोहित मोटवाणी यांनी महाराष्ट्राला तारले होते. राहुल त्रिपाठी, नौशाद शेख यांच्याकडून कर्णधाराला अधिक अपेक्षा आहेत. महाराष्ट्राला सलामी जोडीचा प्रश्न भेडसावत आहे. चांगल्या सुरुवातीची महाराष्ट्राला अपेक्षा आहे. गोलंदाजीत चिराग खुराणा (१८ विकेट) फॉर्मात आहे. त्याला वेगवान गोलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे.
दिल्लीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघात परतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला मुक्त केले असल्याने महाराष्ट्राविरुद्ध तो दिल्लीचा कर्णधार असेल. महाराष्ट्राचे फलंदाज याचे दडपण घेणार नाहीत, असे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले. दिल्लीचा गौतम गंभीरही चांगल्या फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले आहे. त्याला एन. राणा आणि मनन शर्मा यांची चांगली साथ लाभली आहे. गोलंदाजीतही दिल्लीकडे अनेक पर्याय आहेत. इशांतने तीन सामन्यांत १५ विकेट घेतल्या आहेत, तर मनन शर्माने १६ बळी मिळवले आहेत. विकास मिश्रा आणि सैनीची त्यांना चांगली साथ मिळत आहे. दोन्ही संघांची तुलना करता या लढतीत दिल्लीचे पारडे जड मानले जात आहे.