भारत 'अ'ची ऑस्ट्रेलिया 'अ'विरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी
मुंबई : मिताली राजच्या विक्रमी शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारत 'अ' महिला संघाने मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलिया 'अ' संघावर २८ धावांनी मात केली. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ही लढत झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८४ धावा केल्या. यात स्मृती मानधना (१), जेमिमा रॉड्रिगेज (५), हेमलता (२), अनुजा पाटील (०) झटपट माघारी परतल्या. मितालीने एका बाजूने किल्ला लढविला. तिने हरमनप्रीत कौरला साथीला घेत सहाव्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या. मितालीने ६१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारसह नाबाद १०५ धावा केल्या. याच बरोबर मिताली ही टी-२०मध्ये भारताकडून सर्वोच्च खेळी करणारी फलंदाज ठरली. तिने स्मृती मानधनाचा (१०२ धावा) विक्रम मोडला. मितालीने ३१ चेंडूंत अर्धशतक, तर ५९ चेंडूंत शतक पूर्ण केले. हरमनप्रीतने ३२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून ऑस्ट्रेलिया 'अ' संघाला ९ बाद १५६ धावांत रोखले. संक्षिप्त धावफलक : भारत अ - २० षटकांत ५ बाद १८४ (मिताली राज नाबाद १०५, हरमनप्रीत कौर ५७, ताहिला मॅकग्रा २-३६) वि. वि. ऑस्ट्रेलिया अ - २० षटकांत ९ बाद १५६ (ताहिला मॅकग्रा ४७, हेदर ग्रॅहम २४, पूनम यादव २-२९, दीप्ती शर्मा २-३२, अनुजा पाटील २-३१).
.....