नवी दिल्लीः विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला असून, क्रिकेटपटू अंबाती रायुडू याला संघात स्थान मिळालं नाही. यावर रायुडूने खुलेपणाने प्रतिक्रिया दिली नसली, तरी यासंदर्भात एक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी आपण थ्रीडी चष्मा मागवला आहे, असं खोचक ट्विट अंबाती रायुडूने केलं आहे. क्रिकेटपटू विजय शंकर याला संघात स्थान देण्यात आलं आहे. विजय शंकरने खेळाच्या तीनही विभागात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचं विश्वचषकाचं तिकीट निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. याच गोष्टीवर रायुडू नाराज झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय संघात चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी ३३ वर्षीय रायुडूला डच्चू देण्यात आला. याबाबत बोलताना मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, आम्ही रायुडूला संधी दिली होती. मात्र, विजय शंकर याने खेळाच्या तीनही प्रकारात स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार, खेळ करण्याची क्षमता शंकरमध्ये आहे. तो फलंदाजी करू शकतो. गोलंदाजी करू शकतो आणि तो उत्तम क्षेत्ररक्षणही करू शकतो. यामुळेच आम्ही विजय शंकरला चौथ्या स्थानी खेळण्याची संधी दिली आहे, अशी माहिती प्रसाद यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी कर्णधार विराट कोहलीने चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडू योग्य खेळाडू असल्याचं मत व्यक्त केलं होतं. भारतीय संघाच्या घोषणेनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी रायुडूला संघात स्थान न मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं.
काही महिन्यांपूर्वी कर्णधार विराट कोहलीने चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडू योग्य खेळाडू असल्याचं मत व्यक्त केलं होतं. भारतीय संघाच्या घोषणेनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी रायुडूला संघात स्थान न मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं.