मयंक अगरवालला मिळाली संधी
वृत्तसंस्था, बर्मिंगहॅम
पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी मयंक अगरवालला संधी देण्यात आली आहे. मयंकने अद्याप वन-डेत पदार्पण केलेले नाही. तो लंडनमध्ये दाखल होण्यासाठी मायदेशातून निघाला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये दुखापतीमुळे बाहेर पडलेला विजय शंकरला हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. या आधी हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याने सलामीवीर शिखर धवनला वर्ल्ड कपला मुकावे लागले आहे. धवनच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळाले आहे. 'विजय शंकरच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला १९ जून रोजी साउदम्प्टन येथे नेटमध्ये सराव करताना दुखापत झाली. जसप्रीत बुमराहचा चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता. अशा स्थितीत तो अफगाणिस्तान आणि विंडीजविरुद्ध खेळला. यानंतर २७ जूननंतर (विंडीजविरुद्धच्या लढतीनंतर) त्याचा त्रास वाढला. यानंतर सीटी स्कॅनमध्ये फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान तीन आठवडे लागणार आहेत. म्हणूनच त्याला या वर्ल्ड कपमधून बाहेर पडावे लागले आहे,' असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेल्या लढतीत विजय शंकरऐवजी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. त्या आधी कर्णधार विराट कोहलीने विजय शंकरचे कौतुक केले होते. विजय शंकर एक मोठी खेळी करण्याच्या अगदी जवळ असून, त्याला संघाबाहेर बसविणे अवघड असल्याचे कोहलीने म्हटले होते. बीसीसीआयने विजय शंकरच्या जागी मयंक अगरवालची निवड केली होती. आयसीसीच्या तांत्रिक समितीने या नावाला मान्यता दिली आहे. कर्नाटकाचा सलामीवीर अगरवालने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. अर्थात, वन-डेत त्याचे पदार्पण झालेले नाही. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 'अ' संघाच्या मालिकेत इंग्लंडमध्ये अगरवालने आपली छाप पाडली होती. ही कामगिरी गृहीत धरून त्याला संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडिज 'अ' संघांचा समावेश असलेली तिरंगी क्रिकेट मालिका भारत 'अ' संघाने जिंकली होती. यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अगरवाल आणि पृथ्वी शॉ आघाडीवर होते.
अंतिम अकरात मिळणार संधी?
खरे तर राखीवमध्ये रिषभ पंत आणि अम्बटी रायुडू यांची नावे होती. त्यातील रिषभला धवनच्या जागी संधी मिळाल्यानंतर रायुडूला संघात स्थान मिळणे अपेक्षित होते. मात्र, अगरवाल सलामीवीर असल्याने त्याला रोहित शर्माच्या साथीने सलामीला पाठवायचे आणि लोकेश राहुलला पुन्हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी पाठवण्याचा विचार संघव्यवस्थापन करीत असल्याचे, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
रोहितने दिली माहिती
विजय शंकरला दुखापत झाल्याची माहिती सर्वप्रथम रोहित शर्माने दिली. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने विजय शंकरला दुखापत झाल्याचे सांगितले. २८ वर्षीय विजय शंकर या वर्ल्ड कपमध्ये तीन सामने खेळला. पाकिस्तानविरुद्ध त्याने नाबाद १५ धावा केल्या; तसेच दोन महत्त्वपूर्ण विकेटही मिळवल्या होत्या. यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने २९, तर विंडीजविरुद्ध १४ धावा केल्या. या दोन्ही लढतींत त्याला गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली नाही.
.............