अ‍ॅपशहर

बाउन्सरसमोर डगमगणार नाही

सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही बाउन्सरचाच मारा होईल. वेस्ट इंडिजच्या सामन्यातील अनुभवातून धडा घेत सराव केला असून, आखूड टप्प्यांच्या माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज डगमगणार नाहीत, असा विश्वास पाकिस्तानचे प्रशिक्षक अझर महमूद यांनी रविवारी व्यक्त केला.

महाराष्ट्र टाइम्स 3 Jun 2019, 4:00 am
वृत्तसंस्था, नॉटिंगहॅम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम azhar-mahmood


सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही बाउन्सरचाच मारा होईल. वेस्ट इंडिजच्या सामन्यातील अनुभवातून धडा घेत सराव केला असून, आखूड टप्प्यांच्या माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज डगमगणार नाहीत, असा विश्वास पाकिस्तानचे प्रशिक्षक अझर महमूद यांनी रविवारी व्यक्त केला.

वर्ल्ड कप स्पर्धेत ट्रेंट ब्रिज येथे शुक्रवारी झालेल्या पाकिस्तानच्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि त्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १०५ धावांमध्ये तंबूत परतला. तर, स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यामध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आफ्रिकेचे फलंदाज नियमित अंतराने बाद झाले होते. जोफ्रा आर्चरच्या एका चेंडूवर हाशिम आमलाच्या डोक्याला दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही इंग्लंडकडून आखूड टप्प्याचाच मारा होईल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महमूद म्हणाले, 'वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आम्ही आखूड टप्प्याचे चेंडू योग्य पद्धतीने खेळू शकलो नाहीत. मात्र, त्यानंतर आम्ही खूप सराव केला असून, इंग्लंडचा संघही याच व्यूहरचनेने सामन्यात उतरेल, असा आमचा अंदाज आहे. पहिल्या सामन्यातील पराभव विसरून, आता आम्ही पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. इंग्लंडचा आम्ही पराभव करू शकतो आणि ती क्षमता आमच्यामध्ये आहे, हे आम्हाला माहीत आहे.'

वेस्ट इंडिजच्या सामन्यातील पराभवामुळे, पाकिस्तानच्या संघाला सलग ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या मालिकेमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ४-० असा पराभव केला आहे. या मालिकेतील कामगिरी सांगताना महमूद म्हणाले, 'या मालिकेमध्ये इंग्लंडने १४३० धावा केल्या, तर आम्ही १३७० धावा केल्या. दोन्ही संघांमधील धावांचे अंतर फार नाही. फक्त आमच्या संघाचे क्षेत्ररक्षण चांगले झाले नाही आणि गोलंदाजांचा अनुभव कमी पडला. या चुकांमधून शिकण्याची गरज आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज