अ‍ॅपशहर

पावसाचा व्यत्यय क्रिकेटमध्ये सर्वांत वाईट: विराट कोहली

'पावसामुळे लढत सुरू होणे आणि थांबणे सर्वांत वाईट गोष्ट आहे. यामुळे दुखापत होण्याची शक्यता अधिक असते,' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 10 Aug 2019, 11:19 am
वृत्तसंस्था, प्रॉव्हिडन्स (गयाना): 'पावसामुळे लढत सुरू होणे आणि थांबणे सर्वांत वाईट गोष्ट आहे. यामुळे दुखापत होण्याची शक्यता अधिक असते,' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rainfall is the worst in cricket says virat kohli
पावसाचा व्यत्यय क्रिकेटमध्ये सर्वांत वाईट: विराट कोहली


भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या मालिकेतील पहिला वन-डे क्रिकेट सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. पावसामुळे ही लढत दोन तास उशिराने सुरू झाली होती. यामुळे सुरुवातीला प्रत्येकी ४३ षटकांचा खेळ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, सहा षटकांचा खेळ होत नाही, तोच पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा षटके कमी करण्यात आली आणि ही लढत प्रत्येकी ३४ षटकांची होईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र, १३ षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यानंतर लढत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी विंडीजने १ बाद ५४ धावा केल्या होत्या. यात कुलदीप यादवने ख्रिस गेलचा अवघ्या चार धावांवर त्रिफळा ‌उडविला. त्यामुळे विंडीजकडून सर्वाधिक धावांचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्यासाठी ख्रिस गेलला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विंडीजकडून सर्वाधिक धावा ब्रायन लाराच्या नावावर आहेत. लाराने २९५ वन-डे सामन्यांत १०३४८ धावा केल्या असून, गेलच्या नावावर २९६ वन-डेत १०३४२ धावा जमा आहेत. खेळ थांबला तेव्हा एव्हिन लुइस ३६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४०, तर शाय होप ११ चेंडूंत ६ धावांवर खेळत होते.

लढत संपल्यानंतर कोहली म्हणाला, 'सामना सुरू होतो आणि पुन्हा थांबतो, ही क्रिकेटमधील सर्वांत वाईट गोष्ट आहे. जेवढ्या वेळा सामना थांबविला जाईल, तेवढे तुम्हाला मैदानावर दुखापत होणार नाही, यासाठी सतर्क राहावे लागते. काही खेळपट्ट्या तर तुमची खरेच कसोटी पाहतात.' कॅरेबियनमध्ये खेळताना काय आव्हाने असतात, असे विचारल्यावर कोहली म्हणाला, 'काही खेळपट्ट्यांवर चेंडूंना चांगला वेग आणि उसळी मिळते. काही खेळपट्ट्या मात्र अतिशय संथ असू शकतात. अशा वेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्हाला खेळावे लागते.' भारत-विंडीजदरम्यानची दुसरी वन-डे आता रविवारी पोर्ट ऑफ स्पेनला होईल. भारताने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-०ने जिंकली आहे. यातील टी-२० मालिकेलाही पावसाचा फटका बसला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज