अ‍ॅपशहर

Ravi Shastri: शास्त्रींचे भवितव्य वर्ल्ड कपवर

सध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि वन-डे वर्ल्ड कपचे वातावरण आहे. मात्र, या दोन्ही स्पर्धा संपल्यानंतर चर्चेत येईल तो भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पदाचा. कारण, वर्ल्ड कपनंतर त्यांचा भारतीय क्रिकेट

MT 21 Mar 2019, 9:03 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravi-shastri


सध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि वन-डे वर्ल्ड कपचे वातावरण आहे. मात्र, या दोन्ही स्पर्धा संपल्यानंतर चर्चेत येईल तो भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पदाचा. कारण, वर्ल्ड कपनंतर त्यांचा भारतीय क्रिकेट संघासोबतचा करार संपुष्टात येत आहे. त्यांच्यासह झालेल्या करारात कार्यकाळ वाढविण्याचा कुठलाही नियम नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी पुन्हा जाहिरात द्यावी लागणार आहे. मात्र, शास्त्रींचे भवितव्य हे भारताच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरच ठरणार आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अनिल कुंबळेंनंतर जुलै २०१७मध्ये रवी शास्त्री यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की अनिल कुंबळेच्या वेळेपासून भारतीय संघाच्या प्रशिक्षक आणि सहायक वर्ग यांना करारात वाढ किंवा नुतनीकरणाचा नियम नाही. म्हणूनच शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, तरी त्यांना करारात वाढ मिळणार नाही. यासाठी स्वतंत्र निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. यासाठी रितसर जाहिरात देण्यात येईल. सर्व पद पुन्हा नव्याने भरण्यात येतील.' सध्या रवी शास्त्री हे प्रमुख प्रशिक्षक असून, संजय बांगर हे फलंदाजी प्रशिक्षक, तर भरत अरुण हे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. आर. श्रीधर यांच्याकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी आहे. वर्ल्ड कपमधील शेवटच्या लढतीपर्यंतच या सर्वांचा बीसीसीआयशी करार आहे. वर्ल्ड कपच्या चौदा दिवसानंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा आहे. जुलैमध्ये होणारी ही स्पर्धा सर्व कसोटी देशांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया बीसीसीआयला लवकरात लवकर करावी लागणार आहे.

शास्त्रींवर विश्वास अधिक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने वर्ल्ड कपमध्ये किमान उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला, तरी शास्त्रींच्या जागी दुसरा प्रशिक्षक येण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्यावर बीसीसीआय विश्वास कायम राखण्याची शक्यता अधिक आहे. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने मागील दोन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ७१ वर्षांनी जिंकली आहे. त्याचबरोबर भारताने द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकल्या आहेत.

महिलांचीही आयपीएल

या वर्षापासून महिलांची मिनी-आयपीएल स्पर्धा होणार असल्याचीही चर्चा आहे. यात तीन संघ असतील. गेल्या वर्षी महिलांचा एक प्रदर्शनीय सामना ठेवण्यात आला होता. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्लूव्ही रमण आणि निवड समितीचे सदस्य यांनी या लीगसाठी ३० नावे दिली आहेत. यात बारा परदेशी खेळाडूंचीही नावे आहे. तीन संघांत प्रत्येकी १४ खेळाडू असतील. तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि अंतिम दोन संघांमध्ये फायनल असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज