मुंबई : अंबटी रायुडूने घेतलेल्या निवृत्तीनंतर क्रिकेट वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असताना भारताचा माजी सलामीवीर आणि आता खासदार बनलेला गौतम गंभीर याने रायुडूच्या निवृत्तीबद्दल निवड समितीवर टीकास्त्र सोडले आहे. रायुडूने आपल्या कारकीर्दीत जेवढ्या धावा केल्या तेवढ्या सगळ्या निवड समितीने मिळूनही केलेल्या नाहीत, असे बोचरे उद्गार गंभीरने काढले आहेत. आयसीसीच्या वर्ल्डकपमध्ये रायुडूचा विचार केला गेला नाही, या कारणास्तवर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केल्याचे बोलले जात आहे. अर्थात, त्याने निवृत्तीमागील कारण बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात दिलेले नाही. गंभीरने एका वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, या वर्ल्डकपमध्ये निवड समितीने अत्यंत निराशाजनक काम केले आहे. त्यांच्या निवड प्रक्रियेमुळे रायुडूने ही निवृत्ती घेतली आहे. ३३ वर्षीय रायुडूला वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. पण विजय शंकर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर फेकला गेल्यानंतर त्याचा विचार झाला नाही. त्याजागी मयांक अगरवालला संधी देण्यात आली. त्यामुळे रायुडू नाराज असल्याची चर्चा होती. गंभीर म्हणाला की, पाच निवड समिती सदस्यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या धावाही रायुडूएवढ्या नाहीत. त्याच्या निवृत्तीमुळे मला खरोखरच खूप वाईट वाटते आहे. वर्ल्डकपमध्ये झालेल्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर ऋषभ पंत आणि मयांक अगरवालची निवड झाली. रायुडूच्या जागी कुणीही असते तर त्याला वाईट वाटलेच असते. गंभीर म्हणतो, रायुडूने आयपीएलसह इतर क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली. तीन शतके आणि १० अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. त्याच्यासारख्या खेळाडूला जर निवृत्ती स्वीकारावी लागत असेल तर ते वाईट आहे.
निवड समितीवर 'गंभीर' टीका
अंबटी रायुडूने घेतलेल्या निवृत्तीनंतर क्रिकेट वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असताना भारताचा माजी सलामीवीर आणि आता खासदार बनलेला गौतम गंभीर याने ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2019, 4:00 am