म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अविनाश साळवी फाऊंडेशनतर्फे आयोजित पहिल्या विजय हजारे स्मृती करंडक बारा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत पाटील क्रिकेट अकादमी संघाने श्री मंगलनाथ महाराज ध्यान मंदिर संघाचा पाच विकेट्स राखून पराभव करीत आगेकूच केली.
मिटमिटा येथील डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर ही स्पर्धा होत आहे. श्री मंगलनाथ महाराज ध्यान मंदिर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात सर्वबाद ८५ धावा काढल्या. त्यात नयन वाणीने सर्वाधिक २८ धावा काढल्या. इतर २५ धावांमुळे त्यांना ८५ धावांपर्यंत मजल मारता आली. जय जैस्वालने नऊ धावांत पाच विकेट्स घेत सामना गाजवला. राहुल पाटीलने तीन गडी बाद करुन त्याला सुरेख साथ दिली.
पाटील अकादमी संघाने १४व्या षटकात पाच बाद ८६ धावा फटाकावत विजयी आगेकूच केली. राहुल पाटीलने ३८ धावा फटाकावत अष्टपैलू कामगिरी बजावली. जय जैस्वालने १७ धावा काढल्या. आदित्य काटेने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त स्कोअरबोर्ड : श्री मंगलनाथ महाराज ध्यान मंदिर क्रिकेट संघ : २५ षटकात सर्वबाद ८५ (नयन वाणी २८, कुणाल दामोधर नाबाद ११, स्वप्नील ओहळ ९, इतर २५, जय जैस्वाल ५-९, राहुल पाटील ३-१२, श्लोक निरगे १-९, आकाश १-९) पराभूत विरुद्ध पाटील अकादमी संघ : १३.५ षटकात पाच बाद ८६ (राहुल पाटील ३८, जय जैस्वाल १७, हुसेन शेख ७, श्लोक निरगे ६, इतर १६, आदित्य काटे २-१२, नयन वाणी, स्वप्नील ओहळ, ओमकार बनकर प्रत्येकी एक विकेट).