अ‍ॅपशहर

दक्षिण आफ्रिका ६ बाद २६९, अश्विनचे ३ बळी

दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि एडन मार्कराम (९४) व हाशिम अमला (८२) यांच्या जोरावर ६ बाद २६९ धावापर्यंत मजल मारली. त्यात भारताला अखेरच्या तासाभरात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे तीन झटपट बळी मिळविता आले आणि पारडे थोडे भारताच्या बाजूला झुकले. ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक ३ बळी घेतले.

Maharashtra Times 14 Jan 2018, 4:00 am
सेंच्युरियन : दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि एडन मार्कराम (९४) व हाशिम अमला (८२) यांच्या जोरावर ६ बाद २६९ धावापर्यंत मजल मारली. त्यात भारताला अखेरच्या तासाभरात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे तीन झटपट बळी मिळविता आले आणि पारडे थोडे भारताच्या बाजूला झुकले. ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक ३ बळी घेतले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम south africa 269 for 6 ashwin 3 wickets
दक्षिण आफ्रिका ६ बाद २६९, अश्विनचे ३ बळी


पहिल्या कसोटीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती, पण या कसोटीत भारताला ते यश पाहायला मिळाले नाही. त्या तुलनेत अश्विनने मात्र ९० धावांत ३ बळी घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने मार्कराम, डीन एल्गर (३१) आणि क्विन्टन डीकॉक (०) यांना बाद केले.

मार्करामचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले असले तरी अमलाने ८२ धावांची खेळी करत खेळपट्टीवर नांगर टाकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. एल्गर-मार्कराम या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली पण एल्गरचा अडथळा अश्विनने दूर केला आणि भारताला ३०व्या षटकात दिलासा मिळाला. त्यानंतर मार्कराम आणि अमला यांनी सूत्रे हाती घेत ६३ धावांची भागीदारी केली आणि संघाला दीडशे धावापर्यंत आणले. मात्र तेव्हाच शतकाच्या समीप पोहोचलेला मार्कराम अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक पार्थिवकडे झेल देऊन परतला आणि दक्षिण आफ्रिकेचा सावरत असलेल्या डाव पुन्हा डगमगला. या धावसंख्येत आणखी ५१ धावांची भर घातल्यानंतर एबी डीव्हिलियर्स इशांत शर्माच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला. ही चूक भारताच्या पथ्यावरच पडली. दोनशे धावांसाठी एक धाव कमी असतानाच दक्षिण आफ्रिका ३ बाद १९९ अशा परिस्थितीत सापडली. पण अमला आणि फाफ डू प्लेसिस (२४) यांनी आपल्या संघाला २४६ धावसंख्येपर्यंत आणले. भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरत असताना अमलाची धावताना झालेली चूक भारताला फायदेशीर ठरली. हार्दिक पंड्याने अचूक चेंडूफेक करून अमलाला धावचीत केले. त्याचे शतकही हुकले आणि दक्षिण आफ्रिकेची बसत असलेली घडीही विस्कटली. दोघांनी ४७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ दोन धक्के बसले आणि ३ बाद २४६ वरून हा संघ ६ बाद २५१ अशा अवस्थेत सापडला.

यष्टिरक्षक डी कॉक शून्यावर बाद झाला. अश्विनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये विराटने त्याचा झेल घेतला. लगेच फिलँडरही शून्यावरच बाद झाला. ८७व्या षटकात भारताने नवा चेंडू घेतला पण दक्षिण आफ्रिकेने आणखी नुकसान होऊ दिले नाही.

पहिल्या कसोटीत यशस्वी ठरलेले बूमराह (०-५७) आणि मोहम्मद शमी (०-४६) यावेळी मात्र स्वैर गोलंदाजी करू लागले आणि मग इशांत, अश्विनला पुन्हा एकदा ही कोंडी फोडण्यासाठी बोलवावे लागले. त्यावेळी अमला-मार्कराम ही जोडी भरात होती. पण मार्करामचा अडथळा अश्विनने दूर केला.

स्कोअरबोर्ड : दक्षिण आफ्रिका ६ बाद २६९ (मार्कराम ९४, हाशिम अमला ८२, फाफ डू प्लेसिस ना. २४, एल्गर ३१, अश्विन ३१-८-९०-३, इशांत शर्मा १६-३-३२-१) वि. भारत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज