अ‍ॅपशहर

आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूंचा संघ जाहीर; बाबर आझमला कर्णधारपद, किती भारतीयांना मिळालं स्थान पाहा...

ट्वेन्टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा एक संघ आयसीसीने बनवला आहे. या संघाचे कर्णधारपद आयसीसीने पाकिस्तानच्या बाबर आझमला दिला आहे. पण या संघात किती भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे, पाहा...

Maharashtra Times 16 Nov 2021, 7:54 am
नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा एक संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद बाबर आझमला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या संघात किती भारतीय खेळाडूंना संधी मिळाली आहे, याची उत्सुकता चाहत्यांनाही लागलेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बाबर आझम (सौजन्य-ट्विटर)

कसे आहे आयसीसीचा सर्वोत्तम संघ, पाहा...
आयसीसीने यावेळी संघातील पहिल्या सलामीवीराचे स्थान हे ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला दिले आहे. या विश्वचषकात वॉर्नरने महत्वाच्या सामन्यांमध्ये धावा केल्या आहेत, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही तोच ठरला होता. त्यामुळे आयसीसीने वॉर्नरची यावेळी सलामीसाठी निवड केली आहे. वॉर्नरबरोबर यावेळी दुसरा सलामीवीर म्हणून इंग्लंडच्या जोस बटलरची निवड केली आहे. सलामीवीराबरोबर बटलरकडे यावेळी यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संघातील तिसऱ्या स्थानी बाबर आझमला ठेवण्यात आले आहे आणि त्याच्याकडे या संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. चौथ्या स्थानावर या संघात श्रीलंकेच्या असालंकाला संधी दिली आहे, त्याचबरोबर पाचव्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमची निवड करण्यात आली आहे. या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मोईन अलीला स्थान देण्यात आले आहे.
आयसीसीने या संघात जोश हेझलवूड आणि अॅडम झाम्पा या दोन विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघातील गोलंदाजांना संधी दिली आहे. त्याचबरोबर या संघात उपविजेत्या न्यूझीलंडच्या संघातील वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टलाही संधी दिली आहे. या संघात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉतर्जेदेखील आहे. या संघात बारावा खेळाडू म्हणून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीला संधी देण्यात आली आहे. आयसीसीने या संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिलेल नाही, त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असेल. भारताच्या एकाही खेळाडूला सातत्यापणे या विश्वचषकात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच आयसीसीने या संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिले नसावे, असे म्हटले जात आहे. पण या संघाचे कर्णधारपद बाबार आझमला देत आयसीसीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. साधारणपणे विश्वविजेत्या संघातील कर्णधाराकडे या संघाचे नेतृत्व सोपवले जाते, पण आयीसीसने यावेळी तसे न करता बाबरला संधी दिली आहे.

महत्वाचे लेख