मुंबई: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंड सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला २४४ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचे तीन बळी घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी सामन्याचा मानकरी ठरला.
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करताना न्यूझीलंडचा डाव ४९ षटकांत २४३ धावांवर रोखला. न्यूझीलंडने आपले पहिले तीन विकेट्स ५९ धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर रॉस टेलर आणि लॅथम यांनी चौथ्या विकेट्ससाठी ११९ धावांची भागिदारी रचली. अखेर यजुवेंद्र चहलने लॅथम अडथळा दूर करत भागिदारी फोडली. त्यानंतर टेलर एका बाजूने फलंदाजीचा किल्ला लढवत असताना भारतीय गोलंदाजांनी इतर किवी फलंदाजांना फार वेळ खेळपट्टीवर स्थिरावून दिले नाही. मोहम्मद शमीने टेलरला झेलबाद केले. टेलरने १०६ चेंडूत ९३ धावांची खेळी साकारली. त्यानंतर किवींचा डाव २४३ धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने ४१ धावांत तीन बळी घेतले. तर, भुवनेश्वर, चहल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
भारत वि. न्यूझीलंड स्कोअरकार्ड पाहण्यासाठी क्लिक करा
ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियाकडे आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी उर्वरित सामन्यात इतर खेळाडूंना खेळवण्याची संधी आहे.