रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एकेकाळी बलाढ्य असलेला मुंबई संघ यावेळी बाद फेरीतही प्रवेश करेल की नाही, याविषयी शंका आहे. प्रशिक्षणातला फोलपणा, दुसऱ्या फळीची कमतरता, संघनिवडीतला गोंधळ यांमुळे मुंबई क्रिकेटचा आलेख घसरत असल्याचे वाचकांचे मत आहे.
दुसरी फळी कुठे?
मुंबईचा अपेक्षित संघच आता राहिलेला नाही. काही प्रमुख खेळाडू संघाबाहेर असले तरी दुसरी फळीही कुठे दिसत नाही. गोलंदाजांचाही दुष्काळ मुंबईकडे दिसतो आहे. ही आताची स्थिती नाही तर गेल्या काही वर्षांत ही कामगिरी खालावत चालली आहे.
- प्रसाद फाटक
तळाच्या क्रिकेटकडे दुर्लक्ष
आपल्याकडे दुसरी, तिसरी फळी नाही हे स्पष्ट असले तरीही त्याकडे लक्ष दिले गेले नाही. कनिष्ठ स्तरावरील खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष दिले जात नाही, तोपर्यंत वरती निकाल मिळणार नाहीत. वयचोरीचाही फटका मुंबईला बसत आहे.
- माणिक मडकईकर
क्लबसंस्कृती लयाला
क्लबची जी एक संस्कृती होती, तीच हळूहळू कमी झाली आहे. मुंबईची ओळख असलेला खडूसपणाही अस्तंगत होत आहे. टी-२०चा प्रभाव वाढत असून, खेळपट्टीवर नांगर टाकण्याचे तंत्रच लुप्त झाले आहे. गोलंदाजांसह प्रशिक्षकांचीही उणीव जाणवत आहे.
- गिरीश जावळे
झटपट क्रिकेटमध्ये रस
आजकाल खेळाडू टी-२०, वनडे क्रिकेटमध्येच अधिक रस घेऊ लागले आहेत. प्रशिक्षकही दर्जेदार नाहीत. मुंबईच्या संघात कुणालाही स्थिरस्थावर होण्याची संधीच दिली जात नाही. प्रस्थापित खेळाडूंकडून कामगिरी होत नसेल तरी त्यांनाच संधी मिळते.
- मंदार देवधर
प्रशिक्षण पद्धतीच नष्ट
प्रशिक्षणाची पद्धतीच आता शिल्लक राहिलेली नाही. जे खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढतात, त्यांना संघात स्थान मिळत नाही आणि मिळाले तर योग्य संधी दिली जात नाही. गोलंदाजांची उणीवही दुखणे आहे. अकादमीत नेमके काय केले जाते?
- विद्याधर पराडकर