गैरवर्तनाबद्दल बीसीसीआयने केली सुब्रमण्यम यांना शिक्षा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कॅरेबियन बेटांवरील भारताच्या उच्चायुक्त कार्यालयातील व्यक्तींशी गैरवर्तन केल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना अखेर शिक्षा झाली. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यांना विंडीज दौरा सोडून मायदेशी बोलावले आहे.
भारतात आल्यावर सुब्रमण्यम यांना बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना भेटून या प्रकरणाचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. कॅरेबियन बेटांवरील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील व्यक्तींशी गैरवर्तन केल्याचा आरोप सुब्रमण्यम यांच्यावर आहे. पाण्याच्या बचतीसंदर्भात एक जाहिरात करण्यासाठी भारत सरकारच्या विनंतीवरून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्याबाबत उच्चायुक्तांच्या कार्यालयातून सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधण्यात आला पण सुब्रमण्यम यांच्याकडून तुच्छतापूर्ण वागणूक देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.
भारतीय संघातील खेळाडू या जाहिरातीत सहभागी झाले होते. त्याचे चित्रीकरण दीर्घकाळ चालले. त्यावर देखरेख करण्याचे काम सुब्रमण्यम यांचे होते. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना ईमेलद्वारे तात्काळ मायदेशी परतण्यास सांगण्यात आले. जे विमान उपलब्ध असेल त्या विमानाने भारतात येण्याचे आदेश सुब्रमण्यम यांना देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते तिथे राहू शकत नाहीत, असे एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफसाठी जे अर्ज करण्यात आले आहेत, त्यात सुब्रमण्यम यांनीही अर्ज केला आहे. प्रशासकीय व्यवस्थापकाच्या पदासाठी पुन्हा ते इच्छुक आहेत. पण त्यासाठी त्यांचा विचार होईल की नाही, हे सद्यस्थितीत सांगणे कठीण आहे.
सुब्रमण्यम यांनी गयाना तसेच त्रिनिदाद अँड टोबॅगोतील भारतीय उच्चायुक्तांची या प्रकारानंतर बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र या चुकीबद्दल त्यांना शिक्षा भोगावी लागणारच आहे.
सुब्रमण्यम यांनी तणावामुळे आपण असे कृत्य केल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सुब्रमण्यम यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, पुरेशी झोप न झाल्यामुळे आणि तणावामुळे आपण असे कृत्य केले. मात्र हे प्रकरण उच्च पातळीवर पोहोचल्यामुळे बीसीसीआयने कारवाई करणे अपेक्षितच होते. खरे तर, सुब्रमण्यम यांना १६ ऑगस्टला मुंबईत बोलावले जाईल, अशी अपेक्षा होती. पण त्याचदिवशी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या मुलाखती होणार आहेत. त्यामुळे मूळच्या तामिळनाडूच्या असलेल्या सुब्रमण्यम यांना चेन्नईला जावे लागेल आणि नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी यांच्यासमोर उपस्थित राहावे लागेल.
सुब्रमण्यम यांनी उच्चायुक्त कार्यालयातून येणाऱ्या दूरध्वनीला उत्तर देणे टाळल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.