निवड समितीत यायला आवडेल
माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मत
म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
'रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे; पण भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणे आता शक्य नाही. मात्र, निवड समितीत काम करण्याची संधी मिळाली तर ती जबाबदारी जरूर स्वीकारेन,' असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी वर्ल्ड कप क्रिकेटच्या निमित्ताने विविध मुद्द्यांवर सडेतोड चर्चा केली. ते म्हणाले, 'मला प्रशिक्षक म्हणून आता काम करणे शक्य नाही. ४०-४५ वयात मला ते नक्कीच शक्य झाले असते; पण निवड समितीची जबाबदारी मला नक्की आवडेल. कारण १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील, भारत 'अ' संघात खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करणे मला नक्की आवडेल. मी जेव्हा निवड समिती अध्यक्ष झालो, तेव्हा भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर होता आणि नंतर तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. मात्र, त्यानंतर मला हटविण्यात आले. एवढे चांगले निवड समिती सदस्य नकोत असा विचार त्यांनी केला असावा. रबरस्टॅम्प असलेले निवड समिती सदस्य नकोत. नाहीतर कर्णधार म्हणेल तोच संघ निवडावा लागतो.'
...म्हणून संघात तीन यष्टीरक्षक
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड झाली त्यावरून बरीच चर्चा झाली. निवड समितीच्या एकूणच दर्जावर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर टीका करतात. त्यांच्या मते निवड समितीपुढे काही दूरदृष्टी असली पाहिजे. सर्व निवड समिती सदस्यांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे. आताच्या निवड समिती सदस्यांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांची बेरीज केली तर ती अवघी १० भरेल. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवच नाही. म्हणूनच भारतीय संघात आता तीन यष्टीरक्षक आहेत. भारतीय संघातील खेळाडू त्यांच्यापेक्षा वरचढ ठरणारच. ते सांगतील त्याप्रमाणे संघनिवड करावी लागते. आता आपण रिषभ पंतला संघात निवडले आहे. हा संघातला तिसरा यष्टीरक्षक आहे. तीन यष्टीरक्षक घेऊन जाण्याचे नेमके कारण काय? दिनेश कार्तिकला तुम्ही संघात स्थान दिले आहे. आता पंतलाही बोलावले आहे. पण हे चौथ्या क्रमांकाचे फलंदाज नाहीत. जो कौंटी क्रिकेटमध्ये धावा करत आहे, त्या अजिंक्यचा तुम्ही विचारच करत नाहीत. यावर अधिक काय बोलावे?
भारत-इंग्लंड अंतिम सामना?
इंग्लंडमधील वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो, असे भाकीत वेंगसरकर यांनी केले आहे. ते म्हणाले, 'वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी अप्रतिम झाली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामन्यात खूपच दबाव होता. पण भारतीय संघ उत्तम खेळला. आता वेस्ट इंडिज, इंग्लंडविरुद्धही महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघाची वाटचाल पाहता आपण उपांत्य फेरीत पोहोचू हे नक्की. भारतासोबत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत पोहोचतील असे वाटते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एक संघ विजेतेपद पटकावेल असे वाटते.'