नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांनी याबाबत आपली मतं मांडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानंही मौन सोडलं आहे. 'पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल,' असं विराटनं म्हटलं आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जून रोजी सामना होणार आहे. पाकिस्तानसोबत न खेळण्याची भूमिका काही माजी क्रिकेटपटूंनी मांडली होती. तर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानला आयते गुण बहाल करण्यापेक्षा सामन्यात पराभूत करावे अशी भूमिका मांडली आहे.