म. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर
शेवटच्या क्षणांपर्यंत उत्कंठापूर्ण ठरलेल्या लढतीत अखेर बीएसएफ जालंधर संघाने संयम राखत टायब्रेकरमध्ये केरळ पोलिस संघाला ४-३ असे पराभूत करून सातव्या अखिल भारतीय गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कामठीच्या मिलिटरी मैदानावर स्पर्धेची अंतिम लढत बीएसएफ जालंधर व केरळ पोलिस यांच्यात झाली. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आघाडी मिळवण्याचे प्रयत्न केले. पहिल्या हाफमध्ये बीएसएफ जालंधर संघाला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, केरळ पोलिस संघाच्या उत्तम बचावापुढे संघाला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे पहिला हाफ ०-०असाच बरोबरीत राहिला.
दुसऱ्या हाफची सुरुवातही दोन्ही संघांनी आक्रमकच केली. मात्र, गोल करण्याच्या अनेक संधी मिळूनही दोन्ही संघांना कोंडी फोडण्यात अपयश आले. त्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत गोलसंख्या ०-० अशीच राहिली व सामन्याचा निकाल टायब्रेकरने लावण्यात आला.
टायब्रेकरमध्येही दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस दिसून आली. बीएसएफ जालंधर संघाकडून कमल किशोर, निलांबर एस ए, रमाकांत एच आणि विशाल यांनी गोल केलेत, तर केरळ संघाकडून केवळ ए.के. शरथ, शोनब एम आणि अनिश हेच गोल करू शकले. केरळ संघाला मिळालेल्या पाचपैकी तीन संधीवरच गोल करता आले, तर जालंधर संघाने मिळालेल्या चारही संधी गोलमध्ये परिवर्तित करत ४-३ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
सामन्यात धोकादायक खेळ केल्याबद्दल जालंधरच्या जितेंद्रला, तर केरळच्या फेरोस कलथिंगलला लाल कार्ड दाखवण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी मंत्री अनिस अहमद यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जेएसडब्लू कळमेश्वरचे मुकुल वर्मा, मेघे समूहाचे यश वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
.....