चोनबुरी (थायलंड) : भारताने १९ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या एएफसी अजिंक्यपद पात्रता फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानचा १८-०ने धुव्वा उडविला. भारताच्या मुलींसमोर पाकिस्तानचा संघ अगदीच दुबळा ठरला. मध्यंतराला भारताकडे ९-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात भारताच्या रेणूने (५२, ५४, ७५, ८९, ९० मि.) पाच गोल नोंदविले. पूर्वार्धात मनीषा (२, २५ मि.), देवनेता (९, २५ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. दया देवीने (२७ मि.) एक गोल केला. पाकिस्तानची गोलकीपर इमान फय्याझने (३० मि.) स्वयंगोल केला. पूर्वार्धात पप्की देवी आणि कॅप्टन जाबामनी तुडूनेही प्रत्येकी एक गोल केले. उत्तरार्धात रेणूव्यतिरिक्त मनीषा (४७ मि.), दया देवी (५६ मि.), रोजा देवी (५९ मि.), सौम्यता गुगुलोथ (७७ मि.) यांनीही गोल केले. या विजयाने मुलींचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. या कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे भारताचे प्रशिक्षक अॅलेक्स अम्ब्रोस यांनी सांगितले.
भारतीय मुलींचीपाकवर १८-०ने मात
भारताने १९ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या एएफसी अजिंक्यपद पात्रता फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानचा १८-०ने धुव्वा उडविला...
Maharashtra Times 25 Oct 2018, 4:00 am