आशियाई चॅम्पियन्स हॉकी
वृत्तसंस्था, मस्कत
हरमनप्रीतसिंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर ४-१ने मात केली. या स्पर्धेत भारताने अपराजित राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर दक्षिण कोरिया संघ चौदाव्या स्थानावर आहे. लढतीच्या पाचव्याच मिनिटाला हरमनप्रीतसिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. याच्या पाच मिनिटानंतर गुरजंतसिंगने गोल करून भारताची आघाडी वाढवली. लढतीच्या २०व्या मिनिटाला कोरियाकडून कर्णधार लीने गोल करून पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराला भारताकडे २-१ अशी आघाडी होती. उत्तरार्धातील ४७व्या मिनिटाला हरमनप्रीतसिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताची आघाडी वाढवली. लढत संपायला एक मिनिट शिल्लक असताना मिळालेला पेनल्टी कॉर्नर हरमनप्रीतने सत्करणी लावला आणि भारताला ४-१ असा विजय मिळवून दिला. भारताचा गोलकीपरने चांगला बचाव करून कोरियाला रोखले.
भारतीय संघाचा हा गटातील पाचव्या सामन्यातील चौथा विजय ठरला. भारताने या स्पर्धेत ओमनवर ११-०ने, पाकिस्तानवर ३-१ने, जपानवर ९-०ने मात केली. चौथ्या लढतीत भारताला मलेशियाने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. या चुका टाळून कोरियाविरुद्ध भारताने सरस खेळ केला. या विजयानंतर भारतीय संघ गटात १३ गुणांसह अव्वल स्थानी राहिला आहे. तत्पूर्वी, जपानने पाकिस्तान १-१ असे बरोबरीत रोखले.