अ‍ॅपशहर

india vs canada: भारताची अंतिम फेरीत धडक

मनदीपसिंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने कॅनडावर ७-३ ने मात करून सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाचे चार सामन्यांनंतर दहा गुण झाले आहेत. यात भारताने तीन विजय मिळवले असून, एक बरोबरी साधली आहे.

MT 28 Mar 2019, 4:00 am
वृत्तसंस्था, इपोह (मलेशिया)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hockey


मनदीपसिंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने कॅनडावर ७-३ ने मात करून सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाचे चार सामन्यांनंतर दहा गुण झाले आहेत. यात भारताने तीन विजय मिळवले असून, एक बरोबरी साधली आहे. भारताची अखेरची लढत शुक्रवारी पोलंडविरुद्ध होईल; पण याच्या निकालाचा भारतीय संघावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण, दुसऱ्या लढतीत कोरियाने मलेशियाला २-१ ने नमवून अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे गटातील एक लढत शिल्लक असतानाच भारत-कोरिया अशी शनिवारची अंतिम लढत निश्चित झाली आहे.

जागतिक हॉकी क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर कॅनडा दहाव्या स्थानावर आहे. भारताने गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या वर्ल्ड कपमधील गटातील लढतीत कॅनडावर ५-१ने मात केली होती. त्यामुळे या लढतीत भारतीय संघ कॅनडाविरुद्ध कसा खेळ करतो, याबाबत उत्सुकता होती. भारतीय संघ या स्पर्धेत सामन्यागणिक प्रगती करीत आहे. भारताने कॅनडाविरुद्ध पहिल्या सत्रापासून आक्रमक सुरुवात केली. लढतीच्या बाराव्या मिनिटाला सुमितकुमार ज्युनियरने कॅनडाच्या 'सर्कल'मध्ये प्रवेश करून पेनल्टी कॉर्नर मिळवला. यावर वरुणकुमारने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. वरुणकुमारचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला. दुसऱ्या सत्रात भारताने धडाकेबाज खेळ केला. यातील अधिकतर खेळ कॅनडाच्या 'डी'मध्येच झाला. लढतीच्या २०व्या मिनिटाला सुमितकुमार ज्युनियरने सुरेख चाल रचली. त्याच्या पासवर मनदीपने गोल करून भारताला २-०ने आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, अमित रोहिदासचा फटका अडविण्यात कॅनडाच्या गोलकीपरने अडविला.

यानंतर भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, हे दोन्ही पेनल्टी कॉर्नर सत्करणी लावण्यात भारताला यश आले नाही. लढतीच्या २६व्या मिनिटाला कॅनडाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर कॅनडाचा ड्रॅगफ्लिकर जॉर्डन जॉनस्टोनला गोल करता आला नाही. पुढच्याच मिनिटाला कोथजितसिंगच्या पासवर मनदीपने कॅनडाचा गोलकीपर अँटोनी किंडलरला चकवून सुरेख गोल नोंदविला आणि भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. लढतीच्या २९व्या मिनिटाला मनदीपने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. मध्यंतराला भारताकडे ४-० अशी आघाडी होती.

उत्तरार्धात भारताने आपला आक्रमक खेळ कायम राखला. चेंडूवर ताबा राखून कॅनडाला गोल करण्याच्या अगदी थोड्याच संधी दिल्या. लढतीच्या ३५व्या मिनिटाला कॅनडाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर मार्क पीअरसनने भारताचा गोलकीपर क्रिशन पाठकला चकवून गोल केला. यानंतर भारताकडून अमित रोहिदास (३९ मि.), विवेक प्रसाद (५५ मि.) आणि नीलकंठ शर्मा (५८ मि.) यांनी गोल केले, तर कॅनडाकडून फिन बूथोयड (५० मि.), जेम्स व्हॅलेस (५७ मि.) यांनी गोल केले. मनदीपसिंगला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

दृष्टिक्षेप...

- मनदीपसिंगने (२०, २७, २९ मि.) दुसऱ्या सत्रात नऊ मिनिटांच्या आत तीन गोल केले.

- तत्पूर्वी, पहिल्या सत्रात वरुणकुमारने (१२ मि.) गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली होती.

- यानंतर मार्क पीअरसनने (३५ मि.) गोल करून कॅनडाची पिछाडी कमी करण्याता प्रयत्न केला.

- उत्तरार्धात भारताकडून अमित रोहिदास (३९ मि.), विवेक प्रसाद (५५ मि.) आणि नीलकंठ शर्मा (५८ मि.) यांनी गोल केले.

- कॅनडाकडून उर्वरित दोन गोल फिन बूथोयड (५० मि.) आणि जेम्स व्हॅलेस (५७ मि.) यांनी केले.

...

गुणतक्ता

संघ सामने विजय पराभव बरोबरी गुण

भारत ४ ३ ० १ १०

द. कोरिया ४ ३ ० १ १०

मलेशिया ४ २ २ ० ६

कॅनडा ४ २ २ ० ६

जपान ४ १ ३ ० ३

पोलंड ४ ० ४ ० ०

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज