म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
विजय क्लब, स्वस्तिक, जय भारत, शिवशंकर सेवा मंडळ यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुषांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विजय क्लब विरुद्ध स्वस्तिक आणि जय भारत विरुद्ध शिवशंकर अशा उपांत्य लढती होतील. त्यानंतर अंतिम लढत होईल. ना. म. जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एक सामना वगळता अन्य सामने तसे एकतर्फी झाले.
पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय क्लबने अंकुर स्पोर्ट्सचा ३७-२४ असा सहज पराभव केला. अमित चव्हाण, झैद कवठेकर यांच्या झंझावाती चढायांना श्री भारती, अभिषेक रामाणे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे विजय क्लबने मध्यांतरालाच २१-०६अशी भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात यंदाचा हंगाम गाजविणाऱ्या अंकुरच्या सुशांत साईलला सूर सापडला; पण तोपर्यंत सामना हातून निसटला होता.
दुसऱ्या सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने गुड मॉर्निग स्पॉर्ट्सवर ३९-२०अशी मात केली. पहिल्या डावात १७-०७अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या स्वस्तिकने दुसऱ्या डावात मात्र सावध खेळ करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. सुयोग राजापकर, सिद्धेश पांचाळ यांच्या आक्रमक चढाया आणि अभिषेक चव्हाण, अक्षय बर्डे यांचा बचाव स्वस्तिकच्या विजयात महत्वपूर्ण ठरला.
जय भारत क्रीडा मंडळाने उजाला क्रीडा मंडळाला ३४-२६ असे रोखत उपांत्य फेरी निश्चित केली आहे. अभिजित होडे, सागर काविलकर, ओमकार मोरे यांच्या चतुरस्त्र खेळाने जय भारताने विश्रांतीपर्यंत १९-०९अशी आघाडी घेत वर्चश्व राखले होते. उत्तरार्धात मात्र उजालाच्या अक्षय भोईर,सुमित पाटील यांनी चढाईत गडी टिपत जय भारतच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्यांना तहा शेखने उत्तम पकडी करत छान साथ दिली. शेवटी पहिल्या डावात घेतलेली आघाडी जय भारतच्या कामी आली.
चुरशीच्या लढतीत शिवशंकर सेवा मंडळाने सत्यम क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान ४३-३०असे संपुष्टात आणले. निलेश साळुंखे,गणेश जाधव यांचा धारदार चढाया, तर तुषार भोईर, सूरज बनसोडे यांच्या आक्रमक पकडींमुळे शिवशंकरने मध्यांतराला २४-१४अशी आश्वासक आघाडी घेतली होती.