अ‍ॅपशहर

योगी सरकारने केली ऑलिम्पिक विजेत्यांवर बक्षीसांची उधळण, पाहा किती करोडो रुपये केले खर्च

७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याआधी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अल्पोपहाराचा आनंद घेतला होता.

Lipi 20 Aug 2021, 10:29 pm
लखनऊ : टोकियो ऑलिम्पिकमधून सात पदकं घेऊन भारतात परतलेल्या भारतीय खेळाडूंचा सन्मान सोहळा सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही पदक जिंकलेल्या खेळाडूंना सन्मानित करत बक्षीसही दिलं. सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला २ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आलं. त्याच्या व्यतिरिक्त रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना प्रत्येकी १.५ कोटी रुपये मिळाले, तर कांस्य पदक विजेते बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि भारतीय पुरुष हॉकी संघाला प्रत्येकी एक कोटी देण्यात आले. यावेळी जवळपास ४२ कोटी रुपये उत्तरप्रदेश सरकारने खर्च केल्याचे पाहायला मिळाले.
खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही सन्मान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uttar pradesh government presents rs 42 crore monetary award to tokyo olympians
योगी सरकारने केली ऑलिम्पिक विजेत्यांवर बक्षीसांची उधळण, पाहा किती करोडो रुपये केले खर्च

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कमही उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रहिवासी आणि मीराबाई चानूचे प्रशिक्षक विजय शर्मा यांना १० लाख रुपये, भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक यांना २५ लाख रुपये आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले. या व्यतिरिक्त, भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले.

चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या खेळाडूंनाही बक्षीस
कुस्तीपटू दीपक पुनिया आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या गोल्फर अदिती अशोक यांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात आले. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशातील १० खेळाडूंना प्रत्येकी २५ लाख रुपयांची बक्षिस रक्कमही देण्यात आली. अंगात ताप असल्यामुळे मीराबाई चानू कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यावेळी म्हणाले की, भारत क्रीडा महासत्ता बनू लागला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेले निकाल हेच दर्शवतात. जर आपण त्याच मार्गावर चालत राहिलो, तर २०२४ आणि २०२८ ऑलिम्पिकमध्ये अधिक चांगले परिणाम मिळतील.

मनप्रीत सिंगने सांगितला ऑलिम्पिक अनुभव
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग म्हणाला की, ज्या प्रकारे या खेळाला प्रोत्साहन दिले जात आहे, ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल. आम्हाला ऑलिम्पिकमध्ये खूप छान अनुभव आला, चढ-उतार आले, पण प्रत्येकाला एकच इच्छा होती की, आपल्याला पदक जिंकायचं आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर आम्ही सर्व निराश झालो होतो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनामुळे नवीन प्रेरणा मिळाली आणि संघाने कांस्य पदकाच्या रूपात ही कामगिरी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज