जागतिक अजिंक्यपद नेमबाजीत अंकुर मित्तलची सोनेरी कामगिरी; भारताला ७ सुवर्णपदके
वृत्तसंस्था, चँगवॉन (दक्षिण कोरिया)
आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा धडाका अजूनही सुरूच आहे. शनिवारी भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. अंकुरच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
जागितक स्पर्धांत अनेक पदके जिंकणाऱ्या अंकुरने १५०पैकी १४० गुण मिळवून शूटऑफपर्यंत लढत नेली आणि नंतर चीनच्या यियांग यांग तसेच स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रझे यांना मागे टाकून सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. २६ वर्षीय अंकुरने चीनच्या खेळाडूला ४-३ असे पराभूत केले आणि स्लोव्हाकियाच्या खेळाडूला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
या सुवर्णपदकासह अंकुरने आणखी एक पदक भारताला जिंकून दिले. सांघिक प्रकारात त्याने मोहम्मद असाब व शार्दुल विहान यांच्या साथीने ब्राँझपदक विजेती कामगिरी केली. इटलीच्या संघाने ४११ गुणांसह सुवर्ण जिंकले तर चीनने ४१० गुणांसह रौप्यपदक पटकाविले. भारतीय संघाला ४०९ गुण मिळाले.
२०२०च्या ऑलिम्पिकसाठी १० मीटर रायफल प्रकारात भारताची जागा निश्चित करणारी अंजुम मुदगिल हिने महिलांच्या ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात ११७० गुण मिळविले पण ती पात्रता फेरीत नवव्या स्थानावर फेकली गेली. पहिल्या आठ खेळाडूच अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे अंजुमची ती संधी हुकली. अंजुम आणि स्वित्झर्लंडची खेळाडू निना ख्रिस्टन यांचे सारखेच गुण झाले होते पण १०च्या वर्तुळात निनाचे ६६ तर अंजुमचे ५६ शॉटस होते.
ट्रॅपच्या मिश्र सांघिक प्रकारात मनीषा कीर व मानवादित्य सिंग राठोड यांची १३९ गुणांसह सहा संघांच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिथे त्यांचे स्थान दुसरे होते. पण अंतिम फेरीत त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्यांनी २४ गुणांची नोंद केली. इटलीच्या एरिका सेसा व लॉरेन्झो फेरारी यांनी सुवर्ण जिंकले.
स्पर्धेच्या सातव्या दिवसानंतर भारताच्या खात्यात २० पदके जमा झाली असून त्यात ७ सुवर्ण आणि तेवढीच रौप्य तर सहा ब्राँझपदकांचा समावेश आहे. भारत हा कोरियापाठोपाठ दुसऱ्या स्थानी असून चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेतून भारताने ऑलिम्पिकमधील दोन प्रकारात जागा निश्चित केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.