'करोना'च्या पार्श्वभूमीवर बॅडमिंटनपटू साईनाची मागणी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिक पात्रतेच्या स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रतेची मुदत वाढवण्यात यावी,' अशी मागणी भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांनी केली आहे.
आतापर्यंत करोनाच्या कारणावरून लिंगशुई चायना मास्टर्स, व्हिएतनाम इंटरनॅशनल चॅलेंज, जर्मन ओपन आणि पोलिश ओपन या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सायनाने ट्विटरवरून ही मागणी केली असून संबंधित ट्विटमध्ये जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांनी टॅग केले आहे. सायना सध्या जागतिक महिला एकेरी क्रमवारीत २२ व्या स्थानी असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी तिला आघाडीच्या १६ बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान पटकावावे लागणार आहे. पुरुष एकेरीत कश्यप आणि किदाम्बी श्रीकांत हे खेळाडू अनुक्रमे २४ व्या आणि २१ व्या स्थानी आहेत.
ऑलिम्पिक पात्रतेसाठी अंतिम मुदत २८ एप्रिल असल्याने त्यापूर्वीच्या स्पर्धेतील कामगिरीद्वारेच सायना, कश्यप आणि श्रीकांतला क्रमवारीत झेप घ्यावी लागेल. त्यादृष्टीने ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा (११ ते १५ मार्च), स्विस ओपन, इंडिया ओपन, मलेशिया ओपन आणि सिंगापूर ओपन इतक्याच स्पर्धांचे पर्याय या खेळाडूंपुढे उपलब्ध आहेत. तथापि, करोनाचा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे या स्पर्धांच्या आयोजनावरही अनिश्चिततेचे सावट आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंप्रमाणेच चीनचा दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा खेळाडू लिन डॅनही सध्या जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत तिसाव्या स्थानी असल्याने त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमधील समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह आहे.