म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यस्तरीय १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीच्या विश्वा शाह आणि पुण्याच्या गौरव झगडे यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटाकावले.
उस्मानपुरा भागातील कलश मंगल कार्यालयात ही स्पर्धा झाली. मुलींच्या गटात सांगलीच्या दुसऱ्या मानांकित विश्वा शाहने सात फेऱ्यांमध्ये सहा गुणांची कमाई करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत विश्वाने कल्याणी चव्हाण, रिया कौटकर, सिया ठाकरे यांच्याविरुद्ध सहज विजय साकारत आगेकूच केली. चौथ्या फेरीत विश्वाला औरंगाबादच्या ऋतुजा बक्षीकडून पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर विश्वाने संजना जोएल, सानी देशपांडे, श्रेया राठी यांच्यावर मात करीत सहा गुणांसह जेतेपद मिळवले. या गटात सिया ठाकरेने पाच गुणांसह उपविजेतेपद मिळवले. औरंगाबादची ऋतुजा बक्षी पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. औरंगाबादच्या सानी देशपांडेने चौथे स्थान मिळवताना चार गुण मिळवले. धनश्री राठी (चार गुण) पाचव्या स्थानावर राहिली.
मुलांच्या गटात पुण्याच्या गौरव झगडेने सहा गुणांची कमाई करीत विजेतेपद पटाकावले. या स्पर्धेत गौरव अपराजित राहिला. त्याने सम्यक कटारिया, ओम सरोदे, प्रणव नानकर, अंजनेया पाठक, केदार मोरवेकर यांचा पराभव करीत विजेतेपद निश्चित केले होते. अखेरच्या दोन डावांत गौरवने सुयोग वाघ व कशीश जैन यांच्याविरुद्धचे डाव बरोबरीत सोडवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या गटात सुयोग वाघने (पाच गुण) उपविजेतेपद मिळवले. औरंगाबादच्या इंद्रजित महिंद्रकरने पाच गुणांसह तिसरे स्थान मिळवले. कशीश जैन (पाच गुण) चौथ्या तर अंजनेया पाठक (पाच गुण) पाचव्या स्थानावर राहिला.