आजपासून दोन दिवस चाचणी; पण संघनिवडीतला घोळ कायम
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दोहा (कतार) येथे होणाऱ्या आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्सच्या ४८ व्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या संघनिवडीवरून अजूनही गोंधळ सुरूच असून २९ व ३० सप्टेंबरला ही चाचणी भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत (साई) घेतली जाणार आहे. पण ही चाचणी खेळाडूंच्या एकत्रित कामगिरीवरून केली जाईल, या 'साई'च्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरी गंमत आहे ती अशी की, ही स्पर्धा सांघिक आहे. यात वैयक्तिक कामगिरीला स्थान नाही. या स्पर्धेसाठी पुरुष आणि महिलांच्या संघांत प्रत्येकी चार खेळाडू असणे गरजेचे आहे. पण या निवड चाचणीत पुरुष आणि महिलांमधील प्रत्येकी २ खेळाडूच निवडले जाणार आहेत, मग जर पूर्ण संघच निवडला जाणार नसेल तर ही चाचणी हवीच कशाला, असे जिम्नॅस्टचे म्हणणे आहे. भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनची मान्यता काढून घेतल्यामुळे फेडरेशन आणि सरकार यांच्यात सध्या संघर्षाचे वातावरण आहे. त्यातूनच संघनिवडीचा हा गोंधळ सुरू असल्याची चर्चाही जिम्नॅस्टिक्स वर्तुळात सुरू आहे.
यासंदर्भात एका जिम्नॅस्टने म्हटले की, आमची निवड ही सर्व अॅपरेटसवरील कामगिरीला धरून केली जाणार आहे, हे आम्हाला आता कळले. सर्वसाधारणपणे ही माहिती आम्हाला महिनाभर आधी कळते. पण यावेळी आम्हाला आठवड्याचा कालावधीही मिळालेला नाही. शिवाय, ही निवड वैयक्तिक की एकत्रित कामगिरीच्या आधारावर केली जाणार आहे की नाही, हे माहीतच नव्हते.
या खेळाडूने सांगितले की, आता आमच्याकडे तयारीसाठी वेळच नाही. मी तीन प्रकारांसाठी तयारी केली आहे. सांघिकसाठी तीन पुरुष आणि तीन महिला आवश्यक आहेत. पण इथे तर केवळ चारच खेळाडू निवडले जाणार आहेत. मग एकत्रित कामगिरीवर संघनिवड करण्याची गरज काय ? जर तिथे संघच नसेल तर खेळण्याला काय अर्थ आहे?
दरम्यान, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपा कर्माकर ही या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता अत्यल्प आहे. तिच्या गुडघेदुखीमुळे तिचा सहभाग निश्चित नाही. आशीष कुमार आणि अरुणा रेड्डी यांनी तर या स्पर्धेत न खेळण्याचे आधीच ठरविले आहे.
याआधी, क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाठविण्यास नकार दिला होता. जिम्नॅस्टिक्स फेडरेशनला मान्यता नसल्यामुळे क्रीडा मंत्रालय हिरवा कंदिल दाखविण्यास तयार नव्हती. पण खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर 'साई'ने चाचणीचा निर्णय घेतला.
भारतीय खेळाडूंना किती संधी ?
या स्पर्धेतून सर्वोत्तम तीन संघ २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार आहेत. अर्थात, भारतीय खेळाडूंचे रँकिंग खूपच मागे असल्यामुळे संघ म्हणून ऑलिम्पिकसाठी पात्र होणे कठीणच आहे. वैयक्तिक कामगिरीही इथे पाहिली जाईल, पण त्याचा ऑलिम्पिक पात्रतेसाठी उपयोग नाही. त्यातही भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचणे मोठे कठीण आहे. त्यामुळे केवळ सहभागापुरते भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळू शकतील.