विल्यमसन ८९; इशांतला तीन विकेट
वृत्तसंस्था, वेलिंग्टन
कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्या ९३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने कसोटी क्रिकेट मालिकेतील सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २१६ धावा केल्या आणि दुसऱ्या दिवसअखेर ५१ धावांची आघाडी घेतली. खेळ थांबला तेव्हा ब्रॅडली-जॉन वॅटलिंग १४, तर कॉलिन डीग्रँडहोम ४ धावांवर खेळत होते.
'बसिन रिझर्व्ह'मध्ये हा सामना सुरू आहे. भारतीय संघाचा पहिला डाव १६५ धावांत आटोपला. कालच्या धावसंख्येत भारताला केवळ ४३ धावांची भर घालता आली. प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने केन विल्यमसनच्या कर्णधारपदाला साजेशा खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसअखेर ७१.१ षटकांत ५ बाद २१६ धावा केल्या. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माने आपल्या भेदक माऱ्याद्वारे न्यूझीलंडच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. मात्र, केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. केनचे शतक ११ धावांनी हुकले. केनने १५३ चेंडूंत ११ चौकारांसह ८९ धावांची, टेलरने ७१ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली.
न्यूझीलंडची सुरुवात म्हणावी अशी झाली नाही. उपाहारापर्यंत न्यूझीलंडने बिनबाद १७ धावा केल्या होत्या. मात्र, उपहारानंतर तिसऱ्याच षटकात इशांतने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. इशांतने टॉम लॅथमला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्यानंतर टॉम ब्लंडेल आणि केन विल्यमसन यांनी न्यूझीलंडला अर्धशतकी टप्पा पार करून दिला. विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. त्यांनी चहापानाला न्यूझीलंडला शतकी टप्पा पार करून दिला.
तत्पूर्वी, पहिल्या दिवशी भारताने ५५ षटकांत ५ बाद १२२ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्यावर भारताची भिस्त होती. मात्र, शनिवारी सकाळी चौथ्याच षटकात पंत धावबाद झाला आणि त्यापाठोपाठ आलेल्या अश्विनला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे भारताची ७ बाद १३२ अशी अवस्था होती.
स्कोअरबोर्ड
भारत ६८.१ षटकांत सर्वबाद १६५ (पृथ्वी साव १६, मयंक अगरवाल ३४, चेतेश्वर पुजारा ११, विराट कोहली २, अजिंक्य रहाणे ४६, हनुमा विहारी ७, ऋषभ पंत धावबाद १९, महंमद शमी २१, टीम साउदी २०.१-५-४९-४, ट्रेंट बोल्ट १८-२-५७-१, ११-५-१२-०, काइल जेमिसन १६-३-३९-४) वि. न्यूझीलंड ७१.१ षटकांत ५ बाद २१६ (टॉम लॅथम ११, टॅम ब्लंडेल ३०, केन विल्यमसन ८९, रॉस टेलर ४४, इशांत शर्मा १५-६-३१-३, महंमद शमी १७-२-६१-१, रविचंद्रन अश्विन २१-१-६०-१.
खेळ आकड्यांचा...
४ - 'बसिन रिझर्व्ह'मधील कसोटींत भारताचा डाव चौथ्यांदा पावणेदोनशेच्या आत संपुष्टात आला. यापूर्वी,या ग्राउंडवर डिसेंबर २००२मध्ये भारताचा पहिला डाव १६१ धावांत आणि दुसरा डाव १२१ धावांत आटोपला होता. तसेच, फेब्रुवारी १९७६मध्ये या ग्राउंडवर भारताचा डाव ८१ धावांत आटोपला होता. ही या ग्राउंडवरील भारताची कसोटीतीन नीचांकी धावसंख्या आहे.
५ - कसोटी क्रिकेटमध्ये तीनशे विकेटचा टप्पा गाठण्यासाठी इशांत शर्माला आणखी पाच विकेटची आवश्यकता आहे. तो ९७वा कसोटी सामना खेळत असून, त्याने आतापर्यंत ३२.४५च्या सरासरीने २९५ विकेट घेतल्या आहेत.