खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कारांवर शिक्कामोर्तब
२५ सप्टेंबरला पुरस्कार वितरण
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
विराट कोहली आणि मिराबाई चानू यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, याची अधिकृत घोषणा गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आली. ज्या खेळाडू व प्रशिक्षकांची या पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली, त्यांची नावे याआधीच जाहीर करण्यात आली होती, पण त्यावर मंत्रालयातर्फे शिक्कामोर्तब झाले आणि ही यादी पुन्हा गुरुवारी जाहीर केली गेली.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार २५ सप्टेंबरला राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे विजेत्यांना वितरित केले जातील.
खेलरत्न पुरस्काराबरोबरच अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद, जीवनगौरव अशा विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी होईल.
अर्जुन पुरस्कारात भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू हिमा दास, टेटेपटू मनिका बात्रा, धावपटू जिन्सन जॉन्सन, नेमबाज राही सरनोबत अशा २० खेळाडूंचा समावेश आहे.
शिफारस करण्यात आलेल्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांमधील तिरंदाजीचे प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांचे नाव मात्र क्रीडा मंत्रालयाने वगळले आहे. २०१५च्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत त्यांच्याकडून बेशिस्त वर्तन झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून त्यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. म्हणून त्यांचे नाव या यादीतून वगळण्यात आले.