भारताचा सलामीचा
सामना तैपेईशी
मुंबई : इंटरकाँटिनेंटल फुटबॉल स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा सलामीचा सामना १ जून रोजी चायनीज तैपेई संघाशी होणार आहे. चार संघांमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये केनिया आणि न्यूझीलंड हे संघही सहभागी होणार आहेत. मुंबईमध्ये या स्पर्धेचे सामने रंगतील. भारताचा ४ जून रोजी केनियाशी, तर ७ जून रोजी न्यूझीलंडशी सामना होईल. १० जूनला अंतिम सामना रंगणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून भारतासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.
.....
हॅरी केन कर्णधार
लंडन : टॉटनहॅम क्लबचा स्ट्रायकर हॅरी केन याच्याकडे रशियामध्ये होणाऱ्या आगामी फिफा फुटबॉल वर्ल्ड कपसाठी इंग्लंड संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. २४ वर्षीय केनने आतापर्यंत २३ आंतरराष्ट्रीय सामन्यात १२ गोल नोंदवले आहेत. मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने सर्वप्रथम इंग्लंड संघाचे कर्णधारपद भूषवले होते.
...
भारतीय नेमबाज सज्ज
म्युनिच : मागील महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती कामगिरी करणारे जीतू राय, मनू भाकेर, हिना सिद्धू हे भारताचे नेमबाज बुधवारपासून म्युनिच येथे होणाऱ्या आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत. रायफल आणि पिस्तूल नेमबाजांसाठी ही आशियाई स्पर्धेपूर्वीची अखेरची स्पर्धा असल्याने आशियाई स्पर्धच्या तयारीसाठी ती महत्त्वाची आहे. बुधवारी या स्पर्धेमध्ये ५० मी. रायफल प्रोन प्रकारात पुरुष गटामध्ये गगन नारंग, संजीव राजपूत, चैन सिंग, तर महिला गटामध्ये अंजूम मौदगील, तेजस्विनी सावंत आणि श्रेया सक्सेना हे भारतीय नेमबाज सहभागी होतील.
अमन तिवारीचे पाच बळी
मुंबई : न्यू हिंद क्लब आयोजित २८ व्या एल आय सी कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विरार पालघर केंद्राच्या अमन तिवारीने (५/२३) फिरकी गोलंदाजीवर माहुल केंद्राचा अर्धा संघ गारद केला आणि आदर्श सिंगने ३ बळी घेत माहुल केंद्राला १३७ धावांत गुंडाळले. दिवसअखेर मयांक तेवथियाने (नाबाद ६१) अर्धशतक ठोकले आणि १०४/२ धावा करत माहुल केंद्र संघाला सुस्थितीत ठेवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वरळी केंद्राने कांदिवली केंद्राला १३५ धावांत रोखले. त्यात प्रिन्स बदियानीने ३ बळी घेतले.
स्कोअरबोर्ड : १. माहुल केंद्र : १३७/१० (हर्ष राणे ४७, आदर्श सिंग ३/२९, अमन तिवारी ५/२३) विरुद्ध विरार - पालघर केंद्र : १०४/२ (मयांक तेवथिया नाबाद ६१)
२. कांदिवली केंद्र : १३५/१० ( निशांत कदम ३०, देवकरण परमार ३०, प्रिन्स बदियानी ३/५४, आयुष झिमरे २/२३, हर्ष मोपकर २/१५, ओमकार खोत २/१०) विरुद्ध वरळी केंद्र : ७३/२ (तन्मय बुरम ३१).
विदर्भाचा सलग दुसरा विजय
मुंबई : टोटल वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने आयोजित १४ वर्षाखालील खेळाडूंच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पाहुण्या विदर्भ संघाने सलग दुसऱ्या साखळी लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय संपादन केला. चौधरीची ४१ धावांची संयमी खेळी आणि अन्य फलंदाजांच्या छोट्या, पण उपयुक्त खेळींमुळे विदर्भ संघाला विजय मिळविता आला. दुसऱ्या लढतीत गावस्कर संघाने वेंगसरकर संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळवत आपल्या गुणांचे खाते उघडले. वेंगसरकर संघाच्या १६० धावांचा पाठलाग करताना गावास्कर संघाने आज ८ बाद २८१ धावा करून पहिल्या डावातील आघाडीचे गुण वसूल केले. प्रतिक यादव (नाबाद ७६), आयुष वर्तक (५५), अभिनय सिंघ (४६) आणि आर्यन दलाल (४१) या सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने गावस्कर संघाला आघाडी मिळवून दिली.
विकासचा विजय
मुंबई : मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत कुमार गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, विकास, विहंग, जय दत्तगुरु, यंग विजय, गोलफादेवी यांनी तिसरी फेरी गाठली. नायगाव येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात शिवशक्तीने शिवनेरीला ४२-२१ असे सहज नमविले. विनायक, साहिल आवळे यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवशक्तीने मध्यांतराला २६-११अशी महत्वाची आघाडी घेतली होती. शिवनेरीचा अनिरुद्ध कदम एकाकी लढला. दुसऱ्या सामन्यात विकास मंडळाने अमरचा ३६-२८ असा पाडाव केला. अजित पाटील, विराज सिंग यांच्या नेत्रदीपक खेळाच्या बळावर विकासाने हा विजय मिळविला. विहंगने बालवीरचा ३६-१४ असा फडशा पाडला. यश नार्वेकर, दीपेश चव्हाण दत्तगुरूंच्या या विजयात चमकले. यंग विजयने गणेशकृपाला ४०-२९ असे पराभूत केले.