म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड आणि महाराष्ट्र दृष्टीहिन बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय दृष्टीहिन बुद्धिबळ स्पर्धेत मिलिंद सामंत, सरिता कटारिया, कार्तिक दामले, वैशाली सालवकर या मानांकितांनी विजयी आगेकूच केली.
खाराकुँआ भागातील पोरवाल भवन येथे या स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. या स्पर्धे ५३ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत १६ फिडे रेटिंग असलेल्या खेळाडूंचाही सहभाग आहे. मिलिंद सामंतने हरिष खरातला पराभूत करुन आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित मदन भाग्यटकरने विकास खिल्लारेला नमवले. वैशाली सालवकरने नितीन कुंभारवर मात केली. सरिता कटारियाने अशोक कुंभारला पराभूत केले.
पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे दत्तात्रय जाधव, धनाजी काकडे, मनोज सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा बुद्धिबळ संघटेनचे सचिव हेमेंद्र पटेल यांनी स्पर्धेला भेट दिली.
निकाल : रोशन दहिवारे वि. वि. अविनाश लाटे, मधुकेश राम वि. वि. यतींद्र पाटणकर, निलेश राठोड वि. वि. तुकाराम वाकडे, पंकज बेंद्रे वि. वि. ज्ञानेश्वर साबळे, कृष्णा सपकाळ वि. वि. नरेंद्र सालवकर, सचिन बडाने वि. वि. मयुरी साळवे.