खेलो इंडियातील पदकविजेत्यांचा गौरव
सुवर्ण पदकासाठी १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजार तर ब्राँझ विजेत्यांना ५० हजार
मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या "खेलो इंडिया युथ गेम्स २०१९" मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख रूपये, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार तर ब्राँझ विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे, अशी घोषणा गुरुवारी क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली.
"खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला ८५ सुवर्ण ६१ रौप्य आणि ८१ कांस्य असे पदके मिळविण्याचा मान मिळाला आहे. या खेळाडूंचा अभिनंदन सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता.
आगामी आशियाई आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकवण्याचे ध्येय खेळाडूंनी आता ठेवावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले. यावेळी तावडे यांनी खेलो इंडिया मधील विजेते खेळाडू/प्रशिक्षक व पालकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि खेळाडूंच्या तसेच प्रशिक्षकांच्या समस्यांना सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विजेत्या ठरलेल्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक, वेटलिफ्टींग, ज्युदो, कुस्ती, बॅडमिंटन, ॲथलेटिक, शुटींग, फुटबॉल, हॉकी, खो-खो, जलतरण, बॉक्सींग, कबड्डी, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, तिरंदाजी अशा १८ खेळांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धा १७ व २१ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राज्याच्या पथकामध्ये ७२२ खेळाडू व १५६ क्रिडा मार्गदर्शकांनी सहभाग घेतला होता.