वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याशी तीन वर्षांपूर्वी काडीमोड घेतल्यानंतर त्यांची शिष्या व ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवालने पुन्हा एकदा गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची तयारी दर्शविली आहे. गच्चीबौली, हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या अकादमीत आता सायना सरावाला प्रारंभ करणार आहे. मुख्य म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक दिन असताना सायनाने आपल्या गुरुकडे परतण्याचा निर्णय घेतल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. तिचे सध्याचे प्रशिक्षक विमलकुमार यांनाही तिने या निर्णयाची कल्पना दिली आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या सायनाला मांडीच्या स्नायूचा त्रास जाणवत आहे. ही दुखापत बरी झाल्यानंतर ती सरावाला सुरुवात करणार आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तिने ब्राँझपदकविजेती कामगिरी करून दाखिवली होती. या कामगिरीनंतर तिने आता गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा विचार केला आहे.
सायनाने ट्विटरवरून आपल्या या निर्णयाची माहिती दिली. ती लिहिते की, ‘मी आता माझ्या सरावासाठी पुन्हा एकदा हैदराबादला गोपीचंद यांच्या अकादमीत जाण्याचा विचार करत आहे. माझे यासंदर्भात गोपी सरांशी बोलणे झाले आहे आणि त्यांनी मला पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्याची तयारीही दाखविली आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.’
सायना पुढे लिहिते की, ‘कारकीर्दीच्या या टप्प्यावर माझे ध्येय गाठण्यासाठी गोपीचंद मला मदतीचा हात देऊ शकतात. घरी परतल्याचा आणि हैदराबादमध्ये सराव सुरू करत असल्याचा आनंद होत आहे.’
सायना पुन्हा हैदराबादेत पोहोचल्यामुळे तिला आता एकेरीसाठी यावर्षी नियुक्त करण्यात आलेले प्रशिक्षक मुल्यो हॅनदोयो यांच्या मार्गदर्शनाखालीही सराव करता येईल. मुल्यो यांच्या देखरेखीखाली भारताने बऱ्याच स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. पी. व्ही. सिंधूने जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य जिंकले तर किदांबी श्रीकांतने इंडोनेशिया व ऑस्ट्रेलियात लागोपाठ विजेतीपदे पटकाविली. सिंगापूरमध्ये झालेल्या साई प्रणितने पहिली सुपर सीरिजही जिंकली. इंडोनेशियाचा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू तौफिक हिदायत याने मुल्यो यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्षेत्र गाजविले आहे.
सायनाचे विद्यमान प्रशिक्षक विमलकुमार यांसंदर्भात म्हणतात की, ‘जागतिक स्पर्धेहून परतल्यानंतर सायनाने मला विचारले की, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या मुल्यो यांच्याकडे मला मार्गदर्शन घ्यायचे आहे. मुल्यो हे हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या अकादमीत शिकवतात. मी तिला सांगितले की, तसा प्रयत्न करायला काहीही हरकत नाही.’
विमल कुमार यांच्या मते प्रत्येक खेळाडूला आपल्या देशासाठी कामगिरी उंचावण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ते म्हणतात, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना खेळाडूंची कारकीर्द फार मोठी नसते. त्यामुळे प्रत्येकवेळेस दर्जा उंचावण्याचा ते प्रयत्न करत असतात. सायना आणि सिंधू यांचे स्थान वेगळे आहे. जर त्या आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करू इच्छित असतील तर त्यांना तशा संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.’
२०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी सायनाने गोपीचंद यांच्याशी काडीमोड घेऊन विमल कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रथमच हे दोघे एकमेकांपासून अलग झाले नाहीत. याआधी, २०११मध्ये सायनाने भास्कर बाबू यांच्याकडे शिकण्याचा निर्णय घेतला होता पण तीन महिन्यातच ती गोपीचंद यांच्याकडे परतली. २०१२मध्ये तिने गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली लंडन ऑलिम्पिक्सचे ब्राँझ जिंकले.
भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याशी तीन वर्षांपूर्वी काडीमोड घेतल्यानंतर त्यांची शिष्या व ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवालने पुन्हा एकदा गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची तयारी दर्शविली आहे. गच्चीबौली, हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या अकादमीत आता सायना सरावाला प्रारंभ करणार आहे. मुख्य म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक दिन असताना सायनाने आपल्या गुरुकडे परतण्याचा निर्णय घेतल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. तिचे सध्याचे प्रशिक्षक विमलकुमार यांनाही तिने या निर्णयाची कल्पना दिली आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या सायनाला मांडीच्या स्नायूचा त्रास जाणवत आहे. ही दुखापत बरी झाल्यानंतर ती सरावाला सुरुवात करणार आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तिने ब्राँझपदकविजेती कामगिरी करून दाखिवली होती. या कामगिरीनंतर तिने आता गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा विचार केला आहे.
सायनाने ट्विटरवरून आपल्या या निर्णयाची माहिती दिली. ती लिहिते की, ‘मी आता माझ्या सरावासाठी पुन्हा एकदा हैदराबादला गोपीचंद यांच्या अकादमीत जाण्याचा विचार करत आहे. माझे यासंदर्भात गोपी सरांशी बोलणे झाले आहे आणि त्यांनी मला पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्याची तयारीही दाखविली आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.’
सायना पुढे लिहिते की, ‘कारकीर्दीच्या या टप्प्यावर माझे ध्येय गाठण्यासाठी गोपीचंद मला मदतीचा हात देऊ शकतात. घरी परतल्याचा आणि हैदराबादमध्ये सराव सुरू करत असल्याचा आनंद होत आहे.’
सायना पुन्हा हैदराबादेत पोहोचल्यामुळे तिला आता एकेरीसाठी यावर्षी नियुक्त करण्यात आलेले प्रशिक्षक मुल्यो हॅनदोयो यांच्या मार्गदर्शनाखालीही सराव करता येईल. मुल्यो यांच्या देखरेखीखाली भारताने बऱ्याच स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. पी. व्ही. सिंधूने जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य जिंकले तर किदांबी श्रीकांतने इंडोनेशिया व ऑस्ट्रेलियात लागोपाठ विजेतीपदे पटकाविली. सिंगापूरमध्ये झालेल्या साई प्रणितने पहिली सुपर सीरिजही जिंकली. इंडोनेशियाचा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू तौफिक हिदायत याने मुल्यो यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्षेत्र गाजविले आहे.
सायनाचे विद्यमान प्रशिक्षक विमलकुमार यांसंदर्भात म्हणतात की, ‘जागतिक स्पर्धेहून परतल्यानंतर सायनाने मला विचारले की, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या मुल्यो यांच्याकडे मला मार्गदर्शन घ्यायचे आहे. मुल्यो हे हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या अकादमीत शिकवतात. मी तिला सांगितले की, तसा प्रयत्न करायला काहीही हरकत नाही.’
विमल कुमार यांच्या मते प्रत्येक खेळाडूला आपल्या देशासाठी कामगिरी उंचावण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ते म्हणतात, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना खेळाडूंची कारकीर्द फार मोठी नसते. त्यामुळे प्रत्येकवेळेस दर्जा उंचावण्याचा ते प्रयत्न करत असतात. सायना आणि सिंधू यांचे स्थान वेगळे आहे. जर त्या आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करू इच्छित असतील तर त्यांना तशा संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.’
२०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी सायनाने गोपीचंद यांच्याशी काडीमोड घेऊन विमल कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रथमच हे दोघे एकमेकांपासून अलग झाले नाहीत. याआधी, २०११मध्ये सायनाने भास्कर बाबू यांच्याकडे शिकण्याचा निर्णय घेतला होता पण तीन महिन्यातच ती गोपीचंद यांच्याकडे परतली. २०१२मध्ये तिने गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली लंडन ऑलिम्पिक्सचे ब्राँझ जिंकले.