ज्युनियर कुस्तीत
साजन अंतिम फेरीत
नवी दिल्ली : भारताच्या साजन भानवाल याने ज्युनियर गटाच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात ७७ किलो गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साजनने युक्रेनच्या मायट्रो गार्दूबेईवर मात केली. आता त्याची लढत रशियाच्या इस्लाम ओपिएव्हवर मात केली. तत्पूर्वी उपांत्यपूर्व फेरीत त्याने नॉर्वेच्या पेर आंदेर्स कुरेवर विजय मिळवला. हरियाणाच्या साजनने जुलैमध्ये झालेल्या ज्युनियर आशिया अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. साजनने फिनलँड येथे गेल्या वर्षी झालेल्या ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले होते. साजनव्यतिरिक्त विजय (५५ किलो) आणि सागर (६३ किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
...
भारताचा पराभव
नवी दिल्ली : भारतीय युवा संघाला १९ वर्षांखालील गटाच्या मैत्रीपूर्ण सामन्यात सर्बियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. सलग दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला चमक दाखविता आली नाही. पहिल्या लढतीत सर्बियाने भारतावर २-०ने विजय मिळवला होता.
...
'शिफारशीची अपेक्षा नव्हती'
नवी दिल्ली : यावर्षी माझ्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली जाईल, अशी अपेक्षा केली नसल्याची प्रतिक्रिया भारताची युवा धावपटू हिमा दासने मंगळवारी व्यक्त केली. या वर्षी अर्जुन पुरस्कारांसाठी २० खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली असून त्यामध्ये हिमाचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये हिमाने एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली होती. त्याचप्रमाणे वीस वर्षांखालील जागतिक स्पर्धेमध्येही तिने सुवर्णपदक पटकावले आहे.
....
अरपिंदरचे लक्ष्य ऑलिंपिक
मुंबई : आशियाई सुवर्णपदकविजेता भारताचा तिहेरी उडीपटू अरपिंदर सिंगने २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच अरपिंदरने आयएएएफ काँटिनेंटल स्पर्धेमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. या वर्षी माझी कामगिरी चांगली झाली. पुढील वर्षी आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याची मला आशा आहे, असे अरपिंदरने सांगितले. १७.१७ मी. ही माझी सर्वोत्तम कामगिरी असून त्यामध्ये सातत्य ठेवल्यास मी ऑलिंपिक पदक मिळवू शकतो, असे अरपिंदर म्हणाला.
....
धोनीने चौथ्या स्थानी यावे
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणे संघासाठी लाभदायक ठरेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केले आहे. फलंदाजीच्या चौथे स्थान महत्त्वाचे आहे. आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने या स्थानावर धोनीसारख्या अनुभवी खेळाडूने येऊन दडपण योग्यरीत्या हाताळणे आणि परिस्थितीनुरूप फलंदाजी करणे महत्त्वाचे ठरेल, असे झहीर म्हणाला.
....
'जसपाल हेच योग्य उमेदवार'
नवी दिल्ली : भारतीय ज्युनियर नेमबाजी संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांना या वर्षी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी केलेल्या शिफारशींच्या यादीतून वगळण्यात आले असले, तरी ते या पुरस्कारासाठी सर्वोत्तम उमेदवार होते, असे ठाम मत भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे (एनआरएआय) अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मनू भाकेर आणि अनीष भनवाला या नेमबाजांनी या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.