के. श्रीकांतचा नव्या नियमांवर आक्षेप
वृत्तसंस्था, बर्मिंगहॅम
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला असला तरी पंचांनी सदोष सर्व्हिसचे दिलेले निकाल याला कारणीभूत आहेत, असे मत त्याने व्यक्त केले आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हुआंग युझियांगविरुद्ध श्रीकांतला हार सहन करावी लागली. बदललेल्या सर्व्हिसच्या नियमांचा फटका खेळाडूंना बसत असल्याचा आक्षेपच श्रीकांतने आपल्या या प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केला.
श्रीकांतला हा सामना ११-२१, २१-१५, २०-२२ असा गमवावा लागला होता. श्रीकांत या सदोष सर्व्हिसच्या निकालांबाबत म्हणतो की, 'पहिल्या गेममध्ये माझ्या हातून चुकीच्या सर्व्हिस झाल्याचा निकाल देण्यात आला. मला हे अपेक्षित नव्हते. कालच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात एकही चूक झाली नाही. हे कसे शक्य झाले ? काल पंचांना माझ्या सर्व्हिसमध्ये एकही चूक दिसली नाही आणि आज अचानक अनेक चुका कशा काय दिसल्या ? हे अगदीच विचित्र आहे.'
श्रीकांतला या सामन्यात दोन मॅचपॉइंट मिळाले होते पण ते त्याच्या हातून निसटले आणि चीनच्या खेळाडूने सामना जिंकला.
भारताची दुहेरीतील उदयोन्मुख जोडी स्ताविकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर जिंकण्याची संधी चालून आली होती पण महत्त्वाच्या क्षणी त्यांच्या सर्व्हिसमध्ये चुका झाल्याचे पंचांनी निर्णय दिल्यामुळे त्यांना हा सामना १६-२१, २१-१६, २१-२३ असा गमवावा लागला.
चिराग याबद्दल म्हणाला की, तिसऱ्या गेमच्या अखेरीस आम्हाला दर २-३ गुणांनी सर्व्हिस सदोष असल्याचा निर्णय दिला जात होता. त्या महत्त्वाच्या क्षणी चुका झाल्यामुळे आम्ही सामना गमावला. आम्ही कमनशिबी ठरलो.
सर्व्हिसच्या नव्या नियमानुसार जमिनीपासून वर १.१५ मीटर अंतरावरून शटल सर्व्हिस करणे आवश्यक आहे.
जर्मन ओपन स्पर्धेत प्रथम हा नियम वापरण्यात आला आणि भारताच्या एन. सिक्की रेड्डी हिने या नियमावर टीका केली. सिक्कीने ट्विट करून आपल्या कारकीर्दीशी हा खेळ खेळला जात आहे, असे विधान केले होते.