अ‍ॅपशहर

आशिया कप: भारताला जेतेपद

चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल डागून बांगलादेशचा पराभव करत भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Maharashtra Times 30 Sep 2016, 7:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ढाका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम u 18 asia cup hockey final india beat bangladesh 5 4 to claim title
आशिया कप: भारताला जेतेपद


चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल डागून बांगलादेशचा पराभव करत भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

भारताला सलामीच्या लढतीत बांगलादेशकडून ४-५ ने पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढत अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर ५-४ अशा गोलफरकाने विजय मिळवला.

भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. चौथ्या मिनिटालाच गुरजंत सिंहने गोल डागून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १४व्या मिनिटाला अजितकुमार पांडेने दुसरा गोल डागला तर पाठोपाठ २०व्या मिनिटाला परमिंदर सिंहने तिसरा गोल डागला आणि ३-० अशी आघाडी घेत भारताने सामन्यावर घट्ट पकड बसवली.

दुसऱ्या सत्रात मात्र बांगलादेशने जोरदार कमबॅक केला. काही मिनिटांच्या फरकाने बांगलादेशने दोन गोल डागले. त्यानंतर भारत आणि बांगलादेश दोन्ही बाजूने अधिक आक्रमक खेळ पाहायला मिळाला. यादरम्यान भारताकडून एक तर बांगलादेशकडून आणखी दोन गोल डागण्यात आले आणि ४-४ अशी बरोबरी झाली. शेवटच्या मिनिटापर्यंत सगळ्यांचीच उत्कंठा ताणली गेली होती. मात्र सामन्याचा निर्धारित वेळ संपायला अवघे २० सेकंद उरले असतानाच अभिषेकने चेंडू गोलपोस्टमध्ये डागला आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, या विजयाबद्दल गृहमंत्री राजनाथ सिंह, क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज