प्रेक्षकांविना स्टेडियममध्ये खेळणे निराशाजनक असल्याचे सचिनचे मत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हजारो प्रेक्षकांच्या समोर खेळणे हे सोपे नसते. चाहत्यांच्या अपेक्षांचा दबाव येऊन भलेभले फलंदाज गारद होत असतात. मात्र, काही फलंदाजांना या अपेक्षाच नवीन उर्जा देत असतात. यापैकीच एक फलंदाज होता, तो सचिन तेंडुलकर. सचिन मैदानात पाय ठेवताच, त्याच्या नावाचा जल्लोष सुरू व्हायचा. सचिन... सचिन... या आवाजाने प्रेक्षक मैदान डोक्यावर घेत होते. म्हणूनच प्रेक्षकांविना क्रिकेट सामने खेळविण्याचा पर्याय निराशाजनक असल्याचे मत सचिनने व्यक्त केले. आज (शुक्रवार) मास्टर ब्लास्टर सचिनचा ४७वा वाढदिवस आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळांच्या स्पर्धा भविष्यात काही काळतरी प्रेक्षकांविना होणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नसेल. प्रेक्षकांना केवळ टीव्हीवरून त्या-त्या खेळाचा आनंद घेता येणार आहे. याबाबत बोलताना सचिन म्हणाला, की स्पर्धेसाठी उतरणाऱ्या खेळाडूंना मैदानात प्रेक्षक नसल्याने निराश नक्की वाटणार आहे. असे अनेक वेळा घडले आहे, की प्रेक्षकांना खेळाडूंकडून योग्य तो प्रतिसाद मिळतो. काही वेळा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खेळावे लागते. मी जर एखादा चांगला फटका मारला, तर मैदानातील प्रेक्षक जल्लोष करतात. हा जल्लोष फलंदाजाला एक वेगळीच उर्मी देऊन जातो. त्याचबरोबर एखादा गोलंदाज भेदक मारा करीत असेल, तर त्यालाही स्टेडियममधील प्रेक्षकांकडून असाच प्रतिसाद मिळतो. तेव्हा फलंदाजावरही दबाव निर्माण होतो. अशा स्थितीत फलंदाजाला आपल्या खेळाने प्रेक्षकांना प्रत्युत्तर देणे भाग असते.
सचिन पुढे म्हणाला, की प्रेक्षकही खेळाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे प्रोत्साहन आणि आपल्या विरोधाबाजूने किंवा आपल्या विरोधात बोलण्याचा त्यांचा आवाज म्हणजे खेळातील गरज आहे.
सामाजिक वावर महत्त्वाचा
करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर क्रिकेटची स्थिती काय असेल, असा प्रश्न विचारल्यावर सचिन म्हणाला, की चेंडूला चकाकी आणताना खेळाडूंना नक्कीच चिंता वाटेल. या विषाणूबद्दल सातत्याने त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतील. जोपर्यंत हा विषाणू आपल्या आजूबाजुला असेल, तोवर सामाजिक वावरचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. एकमेकांना टाळ्या देणे, मिठी मारणे, हस्तांदोलन करणे आता काही काळासाठी टाळावे लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचे पालन करताना त्यांना अधिक दक्ष राहावे लागणार आहे. स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात खेळायला कोणालाही आवडेल.
आधी सुरक्षितता महत्त्वाची
करोनामुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर टी-२० वर्ल्ड कपवरही या विषाणूचे सावट असणार आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलून त्या दरम्यान आयपीएल घ्यावी, असा प्रस्तावही पुढे येत आहे. याबाबत सचिन म्हणाला, की याबाबत मी तरी फार विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे वर्ल्ड कप होईल, की आयपीएल हे मी सांगू शकत नाही. सध्या तरी या विषाणूवर मात करणे, हे एकच उद्दीष्ट आहे. त्यानंतर अनेक गोष्टींवर चर्चा करता येईल. कारण, खेळाडूंची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आयपीएल ऑक्टोबरमध्ये घ्यावी की नाही, याबाबत सरकार आणि बीसीसीआय नक्कीच विचार करतील. पुन्हा क्रिकेटचे सामने बघायला सर्वांनाच आवडणार आहे. मात्र, त्यासाठी सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे.
स्पर्धा कायम असेल
सध्याची परिस्थिती सावरल्यानंतर विजय आणि पराभव याचा खेळाडूंच्या मनावर पूर्वी इतकाच परिणाम होईल का, या प्रश्नावर सचिन म्हणाला, की एखादा खेळाडू स्पर्धेसाठी मैदानात उतरला की तो विजयाचाच विचार करीत असतो. विजय मिळाला नाही, तर निराश होणे कायम राहणार, यात शंकाच नाही. आणि विजय-पराभवामुळेच स्पर्धा प्रेक्षणीय होत असते. मी केवळ मजेसाठी खेळतो आहे. पराभवाचा मला काही फरक पडत नाही, अशा विचार जर खेळाडू करायला लागले, तर स्पर्धेचा स्तर कमालीचा खाली येईल. काहीही झाले तरी मला जिंकायचेच आहे, ही जिद्द स्पर्धा जिवंत ठेवत असते. अर्थात, खेळातील आव्हानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, पण स्पर्धा कायम राहिल.
मानसिक तंदुरुस्ती गरजेची
खेळाडूंची मानसिक तंदुरुस्ती हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. याबाबत सचिन म्हणाला, की खेळाडूंची मानसिक तंदुरुस्ती हा महत्त्वाचा विषय आहे. याकडे प्रत्येकजण जाणीवपूर्वक किंवा नकळत दुर्लक्ष करतो. आता मात्र असे करून चालणार नाही. तुम्हाला मानसिक त्रास होत असेल, तर तुमच्या जवळच्या व्यक्तीची मदत घ्यायला हरकत नाही. किंवा त्याला या समस्येबद्दल सांगायला हरकत नाही. ते तुम्हाला नक्कीच पाठिंबा देतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढतील.