गुणेश्वरन, रामकुमारने सार्थ ठरविला विश्वास
एकेरीच्या परतीच्या लढतींमुळे भारताला मिळाले यश
वृत्तसंस्था, तियानजिन
चीनविरुद्ध पिछाडीवर पडल्यामुळे भारताची सारी मदार दुहेरी आणि परतीच्या एकेरीवरच होती. बोपण्णाने डेव्हिस चषक लढतीआधी पेससह दुहेरीत खेळण्यास राजी नसल्याचे कळविले होते. मात्र दुहेरीत पेससह त्याने छान कामगिरी केली. तिसऱ्या सेटमध्ये गमावलेली सर्व्हिस वगळता भारतीय जोडीने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन चीनच्या दुहेरीच्या जोडीविरुद्ध केले. पहिल्या सेटमध्ये ११व्या गेममध्ये पेसची सर्व्हिस चीनच्या जोडीने भेदली. पण भारताला ब्रेकच्या अनेक संधी चालून आलेल्या असतानाही त्याला अंतिम स्वरूप देण्यात भारतीय खेळाडू कुठेतरी कमी पडत होते.
बोपण्णाच्या सर्व्हिसेसला योग्य प्रत्युत्तर देण्यात चीनच्या खेळाडूंना यश येत नव्हते. तिसऱ्या सेटमध्ये तर ३-१ अशा भक्कम आघाडीनंतर भारतीय जोडीला तीन गेम सलग गमवावे लागले आणि पेस-बोपण्णा ३-४ असे पिछाडीवर पडले होते. पण ५-६ अशी पिछाडी असताना पेसने सर्व्हिस करत होता. पण भारत त्यावेळी ०-३० असा पिछाडीवर पडला पण ही पिछाडी भरून काढत भारताने आणखी एक टायब्रेकर करण्यास चिनी खेळाडूंना भाग पाडले. या टायब्रेकरमध्ये मात्र भारताला अनुभवाची साथ लाभली आणि भारताने एक अविस्मरणीय असा विजय मिळविला.
त्यानंतर भारताला आशा होती ती एकेरीच्या परतीच्या सामन्यांकडून. रामकुमार रामनाथन याने सलामीच्या लढतीत खराब कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला न खेळणारा कर्णधार महेश भूपतीचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. पण त्याने परतीच्या एकेरीत डी वू याच्यावर ७-६ (४), ६-३ अशी मात केली आणि भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्याआधी, पेस-बोपण्णाने भारताला २-१ अशी पिछाडी भरून दिली होती. अखेरच्या निर्णायक सामन्यात डावखुऱ्या प्रज्ञेश गुणेश्वरनने चीनच्या यिबिंग वू याच्यावर ६-४, ६-२ असा विजय मिळविला आणि एका ऐतिहासिक विजयाची नोंद झाली. युकी भांबरी पोटाचे स्नायू दुखावल्यामुळे डेव्हिस सामन्यात खेळण्यास असमर्थ ठरला आणि प्रज्ञेशचा संघात समावेश झाला. भूपतीनेही पहिल्या एकेरीत खेळलेल्या सुमित नागलला संधी न देता प्रज्ञेशवर भरवसा ठेवला आणि त्याने भूपतीचा विश्वास सार्थ ठरविला.
भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा ०-२ अशा पिछाडीवरून असा विजय मिळविला आहे.
भारताला आता विश्व गटात सलग पाचव्यांदा खेळण्याची संधी मिळणार आहे. याआधी, सर्बिया (२०१४), चेक प्रजासत्ताक (२०१५), स्पेन (२०१६) आणि कॅनडा (२०१७) यांच्याविरुद्ध भारताला हार सहन करावी लागली होती. त्याआधी, २०११मध्ये भारतीय संघ १६ देशांच्या या गटात सर्बियाकडून पराभूत झाला होता.
वडिलांना आणि भारतवासियांना विक्रम अर्पण
पेसने या लढतीनंतर खास दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, विश्वविक्रम केल्याचा प्रचंड आनंद आणि समाधान आहे. हा विजय मी माझे वडील, माझे पालक, माझी मुलगी अयाना यांना समर्पित करतो. माझे एकेरीतील डेव्हिस चषक स्पर्धेतील कर्णधार, माझे डेव्हिस चषक दुहेरीतील सहकारी आणि तमाम भारतवासियांना मी हा विक्रम अर्पण करत आहे.
पेस भरभरून बोलताना म्हणाला की, या भारतात जन्मल्याचा मला सार्थ अभिमान आहे. इतकी वर्षे खेळण्याची संधीही मला मिळाली. अनेक वर्षांची खडतर मेहनत त्यामागे आहे. अनेक चढऊतार आहेत.
पेसने डेव्हिस लढतीबद्दल सांगितले की, ०-२ अशा पिछाडीवर असताना आम्ही विजय मिळविला याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. गेली १६ वर्षे मी डेव्हिस लढतीत तीन सामने खेळत आलो आहे. त्यात दोन एकेरी आणि एक दुहेरी. यावेळी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मला खेळायचे होते.