मुंबई क्रिकेट असोसिएशनची भूमिका
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
यावर्षी जानेवारी महिन्यात तीन वर्षांची बंदी घालण्यात आलेला १६ वर्षांखालील क्रिकेटपटू मुशीर खान याच्यावरील बंदी हटवून त्याचा समावेश तत्परतेने १६ वर्षांखालील मुलांच्या विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघात करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असताना त्याची गुणवत्ता लक्षात घेता त्याला संधी मिळावी आणि त्याला सुधारणेस वाव मिळावा यासाठी हे पाऊल उचलल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षीच्या विजय मर्चंट स्पर्धेदरम्यान मुशीर खानने संघसहकाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर तत्कालिन एमसीए हंगामी समितीने तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावली होती. जानेवारी २०२२पर्यंत ही शिक्षा त्याला भोगायची होती. मात्र नुकत्याच झालेल्या एमसीए निवडणुकीनंतर कार्यकारिणीने तातडीने ही शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि मुशीरचा यावर्षीच्या विजय मर्चंट स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला. त्याआधी, त्याला स्थानिक क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. सध्या गुजरातला सुरू असलेल्या विजय मर्चंट स्पर्धेसाठी संभाव्य खेळाडूंमध्ये त्याला संधी दिली गेली.
मुशीरला दिलेल्या या संधीमुळे काही पालकांनी आश्चर्य प्रकट केले. शिवाय, खेळाडूंच्या बेशिस्त वर्तनाबद्दल नियमावली तयार व्हायला हवी, अशी मागणीही केली गेली. एमसीएने तातडीने घेतलेल्या या निर्णयाबद्दलही चर्चा होऊ लागली. अन्य बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूंवरील बंदीही अशीच कमी होणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय पाटील यांनी यासंदर्भात मटाशी बोलताना सांगितले की, 'मुशीर खानच्या गुणवत्तेचा मुंबईला उपयोग करून घेता यावा, यासाठी त्याला संधी मिळाली पाहिजे, हे आमच्या कार्यकारिणीने एकमताने मान्य केले. त्याच्याकडून चूक झाली, पण त्याचे लहान वय लक्षात घेता त्याला सुधारण्याची संधीही मिळायला हवी, अशी आमची भूमिका होती. कुठेही एखाद्या खेळाडूची कारकीर्द उद्ध्वस्त व्हावी असा विचार करता येणार नाही. त्यासाठी अशा खेळाडूंचे प्रबोधन व्हायला हवे.'
कार्यकारिणीवर हितसंबंधांच्या मुद्द्याचे सावट
दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणीतील काही सदस्यांच्या हितसंबंधांच्या मुद्द्यांचीही सध्या चर्चा सुरू आहे. एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये पदाधिकाऱ्यांच्या हितसंबंधांवरून खळबळ उडालेली आहे. आता नव्याने निवडून आलेल्या एमसीए कार्यकारिणी सदस्यांवरही या हितसंबंधांच्या मुद्द्याचे सावट आहे. या मुद्द्यावर एमसीए कार्यकारिणीत चर्चा होण्याची शक्यता आहे. एमसीए अध्यक्ष विजय पाटील यासंदर्भात म्हणाले की, हितसंबंधांचा मुद्दा गंभीर आहे. खरे तर, याविषयी तोडगा काढण्याची गरज आहे. प्रत्येकावर हितसंबंधांचा संशय घेण्यात आला तर काम करणे अशक्य होईल.