अ‍ॅपशहर

भारताच्या पदक जिंकण्याच्या आशेला धक्का; अविनाश साबळेची कामगिरी उंचावली पण...

Avinash Sable: जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेला पदक जिंकण्यात अपयश आले. अंतिम फेरीत तो ११व्या स्थानावर राहिला. अविनाशने याआधी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2022, 8:38 am
नवी दिल्ली : अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी सकाळी भारताच्या पदक मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला. ३ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत महाराष्ट्रचा सुपूत्र अविनाश साबळे याला पदक जिंकण्यात अपयश आले. अंतिम फेरीत अविनाशला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Avinash Sable
अविनाश साबळे


बीड जिल्ह्यातील अविनाशने पात्रता फेरीत ८.१८.४४ इतक्या वेळेसह पहिल्या ३ मध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

वाचा- आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा : पहिल्याच दिवशी भारताची चार सुवर्णांसह बारा पदकांची कमाई

अंतिम फेरीत अविनाशने ८.३१.७५ इतका वेळ घेतला आणि तो ११व्या स्थानावर राहिला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. याआधी २०१९ मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेत अविनाशने १३वे स्थान मिळवले होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अविनाशला अंतिम फेरीत ती लय कायम ठेवता आली नाही. ऑक्टोबर २०१९ नंतरची ही त्याची सर्वात संथ कामगिरी ठरली.

वाचा- रोहित शर्माने विजयाचा चषक फक्त अर्शदीप सिंगच्याच हातात का दिला, जाणून घ्या खरं कारण...



फायनलमध्ये मोरोक्कोच्या सौफियाने एल बक्कलीने ८.२५.१३ वेळेसह सुवर्णपदक जिंकले. इथोपियाच्या खेळाडूने रौप्य तर केनियाच्या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.

अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम गेला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिंपिकच्या आधी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत देखील अविनाशने मोठे यश मिळवले होते. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. अविनाश हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी ६ किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय. १२चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटच्या सेवेत आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख