म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जूनमध्ये दहा तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस होऊनही जिल्ह्यातील निम्म्या धरणांमधील पाणी तळाला गेले आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचे संकट सतावू लागले आहे. जिल्ह्यातील तिनही धरण समूहांमध्ये ३४ ते ३७ टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.
यंदा जूनमध्येच पावसाचे जोरदार आगमन झाले. देवळा, मालेगाव, येवला, बागलाण आणि नांदगाव या पाच तालुक्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहीला आहे. गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने गेल्या महिनाभरात या धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली. गंगापूर धरणातील पाणीसाठा १३ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला. दारणा धरणातील पाणीसाठाही ५२ टक्क्यांच्या वर गेल्याने सलग तीन दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला. असे असले तरी काही धरणे
मात्र या पावसानंतरही कोरडीच राहिली आहे.
पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, नागासाक्या आणि माणिकपुंज या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे ही धरणे कोरडीठाक पडली आहेत. या धरणांमधील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे. दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या धरणांची संख्याही पाच आहे. त्यामध्ये आळंदी, करंजवण, वाघाड, मुकणे, केळझर या धरणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात २४ धरणे असून, त्यामध्ये सद्यस्थितीत १७ हजार ३५३ दशलक्ष घनफुट एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. नांदुरमध्यमेश्वर धरणात ८२ टक्के तर दारणा धरणात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये ४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
धरण समूहातील पाणीसाठा
गंगापूर..............३४ टक्के
पालखेड ...........३७ टक्के
गिरणा .............३५ टक्के